"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:30 IST2026-04-21T12:29:48+5:302026-04-21T12:30:21+5:30
India sends message to Pakistan on One Year after Pahalgam Attack: ऑपरेशन सिंदूरचा प्रतिकात्मक फोटो लावून भरला सज्जड दम

"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
India sends message to Pakistan on One Year after Pahalgam Attack: २२ एप्रिल २०२५ ... हा दिवस भारतासाठी एक काळा दिवस होता. भारताचे हृदय पिळवटून टाकणारी पहलगाम हल्ल्याची घटना या दिवशी घडली. पाकिस्तानात आलेल्या काही दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये सामान्य नागरिकांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचा बळी गेला. त्यावेळच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंना लक्ष्य केले आणि २६ जणांचा जीव घेतला. उद्या बुधवारी पहलगाम हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. याच निमित्ताने एक दिवस आधी, भारतीय लष्कराने एक महत्त्वपूर्ण पोस्ट करून पाकिस्तानला एक संदेश दिला आहे.
लष्कराचा पाकला संदेश
भारतीय लष्कराने एक फोटो आणि एक्स पोस्ट शेअर केली आहे. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने जे ऑपरेशन सिंदूर राबवले होते, त्याचा फोटो पोस्ट करत त्यावर लिहिण्यात येत आहे की, काही मर्यादा किंवा सीमा कधीही ओलांडू नयेत. भारत काहीही विसरत नाही. या फोटोसोबतच एक कॅप्शनदेखील लिहिण्यात आले आहे. "जेव्हा माणुसकीच्या मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा प्रत्युत्तर हे निर्णायक असते. भारत कधीही हल्ले विसरत नाही. ज्या निष्पाप लोकांचा बळी घेतला गेला, त्यांना न्याय देण्यात आला आहे. भारत एकसंध आहे," असे कॅप्शन या फोटोसह देत पाकिस्तानला रोखठोक संदेश देण्यात आला आहे.
When boundaries of humanity are crossed, the response is decisive.
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) April 21, 2026
Justice is Served.
India Stands United.#SindoorAnniversary#JusticeEndures#NationFirstpic.twitter.com/rtgYu9Hg11
पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झाला होता भ्याड हल्ला
२२ एप्रिल २०२५ ला 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत मृत्यूचे तांडव केले. दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करून अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा बळी गेला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आणि अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली.
भारताचे प्रत्युत्तर: ऑपरेशन सिंदूर
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. ६-७ मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) अनेक दहशतवादी तळांना लक्ष्य केले. २२ ते २६ एप्रिल २०२५ दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली होती.