जगामधील सर्वात लोकप्रिय लीगमध्ये आयपीएलचा समावेश होतो. या लीगमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं केल्यास अनेक खेळाडू एका रात्रीत स्टार बनतात. त्यामुळेच सध्या भारतात क्रिकेट खेळ असलेल्या अनेक क्रिकेटपटूंचं आयपीएलमध्ये खेळण्याचं स्वप्न असतं. मात्र अनेक खेळाडूंना अशी संधी मिळत नाही आणि क्रिकेटच्या या नव्या झगमगाटात हे खेळाडू हरवून जातात. आज आपण अशाच एका क्रिकेटपटूबाबत बोलणार आहोत. जो आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर आयपीएलच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला. पण तब्बल ५ वर्षे संधीच न मिळाल्याने त्याला बेंचवरच बसून राहावे लागले.
या अष्टपैलू क्रिकेटपटूचं नाव आहे बाबा अपराजित. बाबा अपराजित भारतातील सर्वात गुणवान खेळाडू म्हणून नावारूपास येत होता. मात्र अष्टपैलू खेळाडू म्हणून मैदान गाजवत होता. एवढंच नाही तर आतापर्यंत त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये फलंदाजीत १० हजारांहून अधिक धावा आणि १७५ हून अधिक बळी टिपले आहेत. बाबा अपराजित तीन वर्षे चेन्नई सुपरकिंग्सच्या संघात होता. त्यानंतर दोन वर्षे तो पुणे सुपरजायंट्स संघात होता. मात्र पाच वर्षे दोन वेगवेगळ्या संघांचा भाग असूनही त्याला प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही.
बाबा अपराजित याने २०१२ च्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाने त्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. तसेच बाबा अपराजितकडे भविष्यातील स्टार क्रिकेटपटू म्हणून पाहिले जाऊ लागले होते. तसेच त्याची अष्टपैलू गुणवत्ता पाहून आयपीएलमधील संघातही त्याचा समावेश झाला होता. मात्र प्रत्यक्ष मैदानात खेळण्याची संधी काही त्याला मिळाली नाही.
असं असलं तरी त्याच्या नावावर एक आगळावेगळा विक्रम आहे. तो म्हणजे बाबा अपराजित प्रत्यक्ष न खेळताही आयपीएल चॅम्पियन खेळाडू बनला. चेन्नई सुपरकिंग्सने ज्या वर्षी आयपीएलचं विजेतेपद पटकावलं त्या वर्षी बाबा अपराजित चेन्नई सुपरकिंग्सच्या संघात होता. मात्र जवळपास पाच वर्षे ड्रेसिंग रूममधील खुर्चीवर बसून काढल्यानंतर आता तो आयपीएलपासून दूर झाला आहे. कधी कधी गुणवत्ता असूनही वेळ आणि परिस्थितीमुळे कशी संधी मिळत नाही, याचं बाबा अपराजि हे एक उत्तम उदाहरण आहे.