"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 17:56 IST2026-04-21T17:56:31+5:302026-04-21T17:56:53+5:30
आपल्या मुलाला कुशीत घेऊन ढसाढसा रडणाऱ्या रेश्माने पतीवर गंभीर आरोप केले आहेत.

"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
उत्तर प्रदेशातील कानपूरमधील नौबस्ता भागातील 'त्रिमूर्ती अपार्टमेंट'मध्ये रविवारी सकाळी दोन जुळ्या बहिणींची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपी वडील शशी रंजन मिश्रा याला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर आपल्या मुलाला कुशीत घेऊन ढसाढसा रडणाऱ्या रेश्माने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितलं की, शशी दारूच्या नशेत सतत मारहाण करायचा. तिला मुलाला घेऊन माहेरी जाण्यास सांगायचा, पण मुलींना मात्र तिच्यासोबत पाठवत नसे. "ज्या माणसावर मी प्रेम केलं, तोच राक्षस निघाला. माझ्या निष्पाप जुळ्या मुलींची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला फाशीच झाली पाहिजे" अशी मागणी करत रेश्माने टाहो फोडला.
रेश्माने दिलेल्या माहितीनुसार, शशीला तिच्या चारित्र्यावर संशय होता. त्याने फ्लॅटमध्ये प्रवेशद्वारापासून आतपर्यंत ६ सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. घरात त्याने स्वतःसाठी एक 'स्पेशल रूम' बनवली होती, जिथे पत्नीला जाण्यासही मनाई होती. तो दोन्ही मुलींना स्वतःच्या खोलीतच ठेवायचा आणि तिथेच झोपवायचा. हत्येची ही घटना नेमकी कधी घडली याची माहिती पत्नीला नाही, मात्र रात्री दीडच्या सुमारास एका मुलीला सीसीटीव्हीमध्ये जाताना तिने पाहिले होते. पहाटे ४:३० च्या सुमारास पती शशीने स्वतःच पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.
"मी मुलींना सांभाळेन, तू निघून जा"
त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या शशी रंजन मिश्रा याचं २०१४ मध्ये पश्चिम बंगालच्या सिलिगुडी येथील रेश्मासोबत लग्न झालं होतं. शशी मूळचा बिहारचा आहे. सुरुवातीचे काही दिवस सुखात गेले, मात्र जुळ्या मुलींच्या जन्मानंतर शशीला दारूचं व्यसन लागलं. त्यांना ऋद्धी आणि सिद्धी नावाच्या ११ वर्षांच्या दोन मुली आणि ६ वर्षांचा एक मुलगा आहे. रेश्माने सांगितलं की, वादादरम्यान शशी नेहमी म्हणायचा की, "तू मुलाला घेऊन मला सोडून जा, मी माझ्या मुलींना एकटं सांभाळेन."
स्वतःलाच दोष देतेय रेश्मा
काही दिवसांपूर्वी रेश्मा माहेरी गेली होती, पण तेव्हाही शशीने मुलींना तिच्यासोबत पाठवण्यास नकार दिला होता. हत्येनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलींच्या मृतदेहाजवळ शशी शांतपणे बसून होता. पोलीस आल्यावर त्याने स्वतःला त्यांच्या स्वाधीन केलं. रेश्मा आता स्वतःच्या नशिबाला आणि निर्णयाला दोष देत आहे. "मी त्याच्याशी प्रेमविवाह केला होता, पण त्या माणसाच्या आत एक राक्षस लपलाय जो एका आईच्या ममतेची हत्या करेल, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती" अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.