अष्टविनायकातील 'ही' तीन मंदिरे १० मे ते ९ जूनपर्यंत बंद, पुरातत्त्व विभागाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:33 IST2026-05-09T11:32:37+5:302026-05-09T11:33:17+5:30
पुरातत्त्व विभागाच्या नियोजनानुसार मंदिरांचा मुख्य गाभारा आणि सभामंडप यांचे पौराणिक स्वरूप जपत दगडी बांधकामाद्वारे संवर्धन करण्यात येणार आहे.

अष्टविनायकातील 'ही' तीन मंदिरे १० मे ते ९ जूनपर्यंत बंद, पुरातत्त्व विभागाचा निर्णय
पुणे: अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या जतन, संवर्धन व दुरुस्ती कामांच्या पार्श्वभूमीवर मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिर, थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिर आणि सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक मंदिर ही मंदिरे १० मे ते ९ जून या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबत धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आली.
अष्टविनायकातील मंदिरांचे जतन, देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. सध्या मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथे मुख्य मंदिर तसेच मंदिर परिसरातील जतन, संवर्धन आणि दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत. पुरातत्त्व विभागाच्या नियोजनानुसार मंदिरांचा मुख्य गाभारा आणि सभामंडप यांचे पौराणिक स्वरूप जपत दगडी बांधकामाद्वारे संवर्धन करण्यात येणार आहे. या कामादरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती कामात अडथळा निर्माण करू शकते. तसेच, कामाचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात पुरातत्त्व विभागाच्या संचालकांनी सहधर्मादाय आयुक्तांकडे परवानगी मागितली होती. त्यानंतर पुरातत्त्व विभाग, मंदिर प्रशासन, पुजारी वर्ग आणि ग्रामस्थ यांचे म्हणणे ऐकून घेत सहधर्मादाय आयुक्तांनी मंदिरे तात्पुरते बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळानेही मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्याचा ठराव मंजूर केला आहे. या कालावधीत मंदिरांमध्ये नित्य पूजाअर्चा व धार्मिक विधी नियमितपणे सुरू राहतील. मात्र, भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. मंदिरांचे पुजारी, बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी, कर्मचारी आणि विश्वस्त यांच्याशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही विकासकामे मंदिरांची दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक असून, ती नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी नागरिकांनी आणि भाविकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.