पुण्यातील पालखी मुक्कामाचा पेच अखेर सुटला; भवानी पेठेतच होणार माऊलींचा मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 19:42 IST2026-05-13T19:42:14+5:302026-05-13T19:42:29+5:30
वारकऱ्यांची वाढती संख्या आणि जागेची टंचाई यामुळे मुक्काम हलवण्याची चर्चा सुरू होती, परंतु प्रशासनाने दिलेल्या लेखी हमीनंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला

पुण्यातील पालखी मुक्कामाचा पेच अखेर सुटला; भवानी पेठेतच होणार माऊलींचा मुक्काम
आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पुणे येथील मुक्कामाबाबत गेल्या काही दिवसांपासून असलेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. वारकऱ्यांची वाढती संख्या आणि जागेची टंचाई यामुळे मुक्काम हलवण्याची चर्चा सुरू होती, परंतु प्रशासनाने दिलेल्या लेखी हमीनंतर यावर्षीही पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरातच होणार असल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीने जाहीर केले आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांना २५ मे २०२६ रोजी दिलेल्या लेखी पत्रात मुक्कामाच्या ठिकाणी विविध उपाययोजना करण्याची ग्वाही दिली आहे. यामध्ये मंदिर परिसरातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी शेजारील ३ खाजगी मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच मंदिरासमोरील फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणे हटवून तो भाग मोकळा करण्यात येत असून भाविकांच्या सुलभ प्रवासासाठी रस्ता निर्मिती आणि अडथळा ठरणारे विद्युत खांब सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहेत. पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर कारवाई सुरू असून पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे.
सन २०१० पासून पुण्यातील मुक्काम रेसकोर्स मैदानावर हलवण्याची मागणी होत होती. भवानी पेठेतील अपुरी जागा, दर्शन रांगेत भाविकांना होणारा ऊन-पावसाचा त्रास आणि पार्किंगच्या सुविधांचा अभाव यामुळे संस्थान कमिटीने १३ एप्रिल २०२६ रोजीची बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. हा पेच सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार हेमंत रासने यांनी विशेष प्रयत्न केले. पुणे महानगरपालिकेने या कामासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली असून ३१ मे २०२६ पर्यंत आवश्यक जागा ताब्यात घेण्याचे आश्वासन दिले आहे.
यावर्षीचा पालखी सोहळा ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आळंदीतून प्रस्थान ठेवेल आणि ९ व १० जुलै असे दोन दिवस पालखीचा मुक्काम पुण्यातील भवानी पेठेत राहील. प्रशासनाने दिलेल्या लेखी हमीपत्रावर बुधवारी (दि. १३) देवस्थानची बैठक पार पडली. याप्रसंगी पालखी सोहळा प्रमुख ऍड. राजेंद्र उमाप, प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, ऍड. रोहिणी पवार, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी, व्यवस्थापक माऊली वीर आदी उपस्थित होते.