‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 23:11 IST2026-05-13T23:10:26+5:302026-05-13T23:11:24+5:30
CM Devendra Fadnavis News: इतर वेळेस शांत, संयमी असलेले देवाभाऊ या प्रकरणात कठोर झाले आणि अनेक दिवस प्रलंबित असलेला प्रश्न काही तासांत सुटला, असे म्हटले जात आहे.

‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
CM Devendra Fadnavis News: संपूर्ण राज्यासह देशात अनेक ठिकाणी तापमानात प्रचंड वाढ झाल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी पारा नवनवे उच्चांक गाठताना पाहायला मिळत आहे. या कडाक्याच्या उन्हाळ्यात एसी, कुलरशिवाय दिवस काढणे कठीण होत चालले आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा येथील उन्हाळा तर सहन होण्यापलीकडचा आहे. यातच विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांचे हाल तर कल्पनेच्या बाहेरचे आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनमुळे सगळ्या यंत्रणा खडबडून हलल्या आणि एक महत्त्वाचा प्रश्न तत्काळ मार्गी लागला. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या बेसा येथील सरकारी मुलींच्या वसतीगृहात अनेक विद्यार्थीनी राहत आहेत. नागपूरचे तापमान ४० अंशाच्याही वर पोहोचले आहे. त्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या मुली घरापासून दूर राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होत्या, तर काही कॉलेजचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिथे राहत होत्या. परंतु, उकाड्यापुढे कोणाचे काहीच चालत नव्हते. कूलर लावून द्या, अशी विनंती वारंवार करण्यात येत होती. परंतु, प्रत्येक वेळेस तांत्रिक अडचणींचे कारण पुढे केले जात होते.
भाजपा कार्यकर्त्याने मुख्यमंत्री फडणवीसांना सांगितले अन्...
सातत्याने तांत्रिक अडचणींचे कारण देत हा विषय मार्गी लागत नसल्यामुळे उन्हाळ्यात या वसतिगृहातील मुलींचा त्रास वाढत चालला होता. शेवटी ही बाब स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली. देवाभाऊंनी तत्काळ दखल घेत थेट अधिकाऱ्यांना फोन लावले आणि चांगलेच सुनावले. जो प्रश्न अनेक दिवस सुटत नव्हता, तो एका फोनमुळे लगेच सुटला.
प्रश्नांची सरबत्ती, अधिकाऱ्यांना जाब विचारला...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती केली. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रश्नांचे ठोस उत्तर नसल्याने केवळ शांत राहणे त्यांनी पसंत केले, असे सांगितले जात आहे. आतापर्यंत कुलर का लावले नाही? एक काम करा, आधी तुमच्या कार्यालयातील फॅन आणि कूलर बंद करा, मग कळेल त्या मुली काय सहन करत आहेत, या शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी कडक भूमिका घेतली.
एक फोन, यंत्रणा हलली अन् लगेचच कूलर पोहोचले
एका फोन कॉलनंतर संपूर्ण यंत्रणा हलली. ज्या तांत्रिक अडचणी अनेक दिवस सुटत नव्हत्या, त्या काही तासांत सुटल्या. बेसा वसतिगृहात कूलर पोहोचले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न देवाभाऊंमुळे सुटला. मुलींनी पत्र लिहून कृतज्ञता व्यक्त केली. ही समस्या फक्त एका वसतिगृहापुरती मर्यादित कशी असणार?, असा विचार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ निर्णय घेतला आणि एक-दोन नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व सरकारी वसतिगृहांसाठी कूलर्स उपलब्ध करून दिले, अशी माहिती देण्यात आली आहे.