"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 11:45 IST2026-05-03T11:42:46+5:302026-05-03T11:45:53+5:30
Nasrapur Case | "वेदना समजून न घेता त्यांनाच मारता? हा कोणता न्याय देवाभाऊ??" विजय वडेट्टीवार यांचा सवाल

"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Nasrapur Case | पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नसरापूर येथे एका साडेतीन वर्षीय चिमुरडीवर ६५ वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून खून केला. क्रूरतेचा कळस म्हणजे दगडाने ठेचलेला मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याची धक्कादायक घटना नसरापूर (ता. भोर) परिसरात उघडकीस आली असून, पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर शुक्रवारी रात्री आंदोलन केले. त्यानंतर शनिवारी मोर्चा काढून बंद पुकारला. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ७ मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
नसरापूर घटनेवर विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
"आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एकच शल्य आहे, "अरे कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र?" नसरापूरमध्ये बलात्कार पीडित बालिकेच्या वडिलांना कॉलर खेचली जाते..न्याय मागणाऱ्या महिलांवर लाठीचार्ज केला जातो व्वा रे महायुती सरकार...बलात्कारी पेक्षा न्याय मागणाऱ्या सामान्य नागरिकांचा त्रास होतोय का तुम्हाला? त्यांना पोलिसी खाक्या दाखवण्यात मर्दुमकी वाटते का?" असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना 3-4 वर्षांची बालिका!
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना 3-4 वर्षांची बालिका! नरसापूरच्या लेकीला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करणाऱ्या माता-भगिनींवर लाठीचार्ज केला जातोय, काल अशीच अमानवी मारहाण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा केली. पाशवी बहुमत मिळाले आहे म्हणून हुकूमशाही पद्धतीने हे सरकार सामान्य जनतेला तुडवत आहे," असा घणाघाती आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
आधीही दोघींवर अत्याचार, तुरुंगाची शिक्षा; तरीही आरोपी मोकाट बाहेर फिरतोय
"या आरोपीने आधीही दोन महिलांवर अत्याचार केले, तुरुंगाची शिक्षा मिळाली तरी हा आरोपी मोकाट बाहेर फिरतोय आणि आज पुन्हा एक लेक बळी पडली. अशी व्यवस्था असेल तर मुलींना, महिलांना सुरक्षित कसे वाटेल? आणि वरून सरकारच पीडितांविरोधात पोलीस बळाचा वापर करत असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? लहान मुलींवर अत्याचार वाढत आहे , पोलिसांवरील विश्वास कमी होत आहे म्हणूनच लोकांना रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे! पण त्यांच्या वेदना समजून न घेता त्यांनाच मारता? हा कोणता न्याय देवाभाऊ??" असा प्रश्न त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.