लाखोंच्या हुंड्याची मागणी; सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ, वाघोलीत २ विवाहितांनी उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 15:31 IST2026-04-20T15:29:19+5:302026-04-20T15:31:43+5:30
लाखोंच्या हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने विवाहितांचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता

लाखोंच्या हुंड्याची मागणी; सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ, वाघोलीत २ विवाहितांनी उचलले टोकाचे पाऊल
पुणे : वाघोली परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये विवाहित महिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दोन्ही प्रकरणांत पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाघोली पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.
पहिल्या घटनेत रचियता अभिषेक गुप्ता (वय ३७) असे मृत महिलेचे नाव आहे. पीडितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पती अभिषेक गुप्ता (वय ३१), सुरेशचंद्र गुप्ता (वय ६५), अनिता गुप्ता (वय ५८), प्राची गुप्ता (वय ३०) आणि साक्षी गुप्ता (वय ३८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पती अभिषेक याला अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी मूळचे आग्रा (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहेत.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपींनी संबंधित विवाहितेकडे १० लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्याने तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. शिवीगाळ, त्रास आणि दबावामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक आहिरे करत आहेत.
दुसरी घटना आव्हाळवाडी भागात घडली. प्रतीक्षा जयसिंग कदम (वय २१) असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी जयसिंग मधुकर कदम (वय २९), हौसाबाई मधुकर कदम (वय ५५) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यातील पती जयसिंग याला पोलिसांनी अटक केली. फिर्यादीत म्हटल्यानुसार, पीडित विवाहितेकडे पाच ग्रॅम सोन्याची अंगठी आणण्याची मागणी करण्यात आली. तसेच कारचे हप्ते भरण्यासाठी पैशांची मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे करत आहेत.