Baramati Bypoll Election: सुनेत्रा पवारांच्या रूपाने राज्याला सक्षम नेतृत्व; बारामतीकर त्यांना मतदानरूपी आशीर्वाद देतील - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 09:44 IST2026-04-22T09:38:13+5:302026-04-22T09:44:44+5:30
Baramati Bypoll Election सुनेत्रा पवारांनी पक्षाची आणि शासनाची धुरा सक्षमपणे सांभाळली असून अजितदादांची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे

Baramati Bypoll Election: सुनेत्रा पवारांच्या रूपाने राज्याला सक्षम नेतृत्व; बारामतीकर त्यांना मतदानरूपी आशीर्वाद देतील - देवेंद्र फडणवीस
बारामती : दुःख बाजूला ठेवून सुनेत्रा पवार यांनी पक्ष आणि शासनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. ‘दादां’चे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यात असून, त्यांच्या रूपाने राज्याला सक्षम नेतृत्व लाभले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार रामराव वडकुते, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, जय पवार, पार्थ पवार, वीरधवल जगदाळे, सचिन सातव आदी उपस्थित होते.
फडवणीस म्हणाले, ही निवडणूक केवळ राजकीय नाही, तर स्वर्गीय अजित पवार यांचा स्मृतीयज्ञ आहे. प्रत्येक मतदाराने मतदान करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी. या यज्ञात आहुती दिली नाही, तर आयुष्यभर काहीतरी अपूर्ण राहिल्याची भावना मनात राहील. म्हणूनच या यज्ञात आपली आहुती अर्पण करण्यासाठी, स्व. अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी येथे जमलो आहोत. जनतेप्रतीचे आपले कर्तव्य अधिक महत्त्वाचे आहे. या भावनेतून सुनेत्राताई पवार यांनी आपले दुःख बाजूला ठेवले आहे. त्यांनी पक्षाची आणि शासनाची धुरा सक्षमपणे सांभाळली आहे. स्व. अजितदादा यांची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे बारामतीकर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सुनेत्राताई यांना मतदानरूपी आशीर्वाद देतील अशी खात्री आहे.
दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात : सुनेत्रा पवार
सुनेत्रा पवार यांनी भावनिक शब्दांत बारामतीकरांशी संवाद साधला. दादांच्या शिवाय सभा घ्यावी लागते, हे मनाला पटत नाही. बारामतीकर आजही त्यांच्या आठवणीत आहेत. त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मी रणांगणात उतरले आहे. मी केवळ मत मागण्यासाठी नाही, तर नातं जपण्यासाठी तुमच्यासमोर उभी आहे, असे त्या म्हणाल्या.