Pune Nasrapur Case: नराधमाने मुलीला आमच्यापासून हिरावून घेतली; रविवारच्या शांतता-मूक मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे - वडिलांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 13:59 IST2026-05-09T13:53:56+5:302026-05-09T13:59:07+5:30
बालगंधर्व रंगमंदिर ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक चौक या मार्गे हा मूक मोर्चा सायंकाळी ५ वाजता निघणार आहे

Pune Nasrapur Case: नराधमाने मुलीला आमच्यापासून हिरावून घेतली; रविवारच्या शांतता-मूक मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे - वडिलांचे आवाहन
पुणे: नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार करुन तिचा निर्घुण खून केलेल्या आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावे आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन रविवारी (दि.१०) शहरात शांतता मोर्चाचे आयोजन केले आहे. बालगंधर्व रंगमंदिर ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक चौक या मार्गे हा मूक मोर्चा सायंकाळी ५ वाजता निघणार आहे.
या घटनेमुळे समाजात तीव्र संतापाची लाट आहे. अशा नराधमांना समाजात स्थान नाही आणि त्यांना कायद्याचा धाक बसणे गरजेचे आहे. आपली न्याय व्यवस्था आणि प्रशासनाला समाजाची एकजूट दाखवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असून, हा मोर्चा पूर्णपणे शांततेच्या मार्गाने आणि मूक स्वरूपात असणार आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि न्यायाची मागणी करण्यासाठी जास्तीत जास्त आई- वडिलांसह तरुण पिढीने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विविध संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
नराधमाने आमच्या मुलीला आमच्यापासून हिरावून घेतली. आजही घरात पूर्णपणे शांतता असून, ती शांतता नव्हे तर रोजचा मृत्यू आहे. त्यासाठी सर्व आई वडिलांना नम्र विनंती आहे की रविवारी विविध संघटनांनी आयोजित केलेल्या शांतता-मूक मोर्चात आई-वडिलांसह सर्वांनी सहभागी व्हावे- पीडित मुलीचे वडील