अहमदनगर: महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसामुळे दरड कोसळून आणि पुरामुळे जनजीवन विस्तळीत झाले आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thakecray) घटनास्थळांवर जात नसल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. 'राज्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो. आताच्या सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी व्यक्त केलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पावसामुळे अनेक इमारती पाण्यात गेल्या आहेत. मात्र आमचे मुख्यमंत्री मातोश्रीत बसले आहेत. ते वर्षा निवासस्थानीही नाहीत, त्यांना मंत्रालयात यायलाही वेळ नाही. मी सकाळी 7 वाजताच मंत्रालयात जाऊन कामाला लागायचो. हा राजकारणाचा विषय नाही, पण उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात येऊन वॉररूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलले पाहिजे. त्यांच्याकडून आढावा घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या पाहिजेत. आम्ही सरकारला कधीही मदत करायला तयार आहोत, असं ते म्हणाले.
आम्ही थेट फिल्डवर जायचोपाटील पुढे म्हणाले की, जेव्हा 2019 साली राज्यात महापूर आला होता, तेव्हा 15 दिवस पाणी ओसरत नव्हतं. मी आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) थेट फिल्डमध्ये जायचो. हेलिकॉप्टर, बोटीच्या माध्यमातून आम्ही पोहचलो होतो. अनेक वेळा पाण्यात बसून निर्णय करायचो. त्यावेळी आमच्यावर काँग्रेसकडून टीका केली जात होती. आताही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, निर्णय घेतले पाहिजेत, असे पाटील म्हणाले.