Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 15:57 IST2026-05-02T15:54:19+5:302026-05-02T15:57:34+5:30
Pune crime - पुणे जिल्हा हादरवणारी घटना! ३:३० वाजता दिसली शेवटची... ६ वाजता समोर आलं काळजाचा ठोका चुकवणारं सत्य

Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
नसरापूर ( पुणे जि. ) : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर नसरापूर गावात तीव्र संताप उसळला असून ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतरही न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन छेडले. रात्री उशिरापर्यंत रास्ता रोको, पोलीस ठाण्याला घेराव आणि दुसऱ्या दिवशी गावबंद आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
कसा उलगडला संपूर्ण घटनाक्रम?
शुक्रवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पीडित चिमुकली शेवटची राम मंदिर परिसरात दिसली. पाऊण तास उलटूनही मुलगी घरी न परतल्याने तिच्या आजीने शोध सुरू केला. त्यानंतर ग्रामस्थही शोध मोहिमेत सहभागी झाले. दरम्यान, गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता एक संशयित व्यक्ती चिमुकलीला घेऊन गोठ्याकडे जाताना दिसला. ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम राबवत आरोपीला बनेश्वर फाट्याजवळ पकडले. संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिल्यानंतर आरोपीने मुलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपविल्याची कबुली दिली. संध्याकाळी मृतदेह बाहेर काढताच गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. पोलिसांना घटनास्थळी घेराव घालण्यात आला. त्यानंतर रात्री राजगड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. रात्री ९ वाजता ग्रामस्थांनी बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
एसपींच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे
रात्री उशिरा पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. आरोपीवर कठोर कारवाई व जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र ग्रामस्थांनी शनिवारी गावबंदची हाक दिली. शनिवारी सकाळपासून नसरापूर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी दाखल होत पुरावे संकलित करण्याचे काम सुरू केले. त्यानंतर भैरवनाथ मंदिरापासून मोठा मोर्चा काढण्यात आला.
सीएमशी थेट चर्चा हवी; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
मोर्चा आंदोलन सभेत रूपांतरित झाल्यानंतर स्थानिक नेते, माजी आमदार आणि आमदारांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले, तर माजी आमदार संग्राम थोपटे यांनी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले.
तरीही आंदोलकांनी थेट मुख्यमंत्रीांशी चर्चा करण्याची मागणी लावून धरली. अखेर मंत्री आदिती तटकरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधल्यानंतर आणि दोन्ही आमदारांच्या विनंतीनंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. मात्र गावकऱ्यांचा संताप अद्याप कायम आहे.