PMO च्या ‘या’ स्पेशल प्लॅनमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालं ‘कोरोना’पासून सुरक्षा कवच

By प्रविण मरगळे | Published: November 9, 2020 11:26 AM2020-11-09T11:26:16+5:302020-11-09T11:30:45+5:30

देशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव झाल्यापासून अनेकांना या रोगाची लागण झाली, यातून मोठमोठे नेतेही सुटले नाहीत, या संसर्गजन्य कोरोना साखळीत लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली, मंत्र्यापासून उपराष्ट्रपतींपर्यंत व्हीव्हीआयपी लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकले.

कोरोनामुळे लोकांच्या जीवनात बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे व्हीव्हीआयपींना भेटण्याचा प्रोटोकॉल. कोविडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रत्यक्ष भेटींचे प्रमाण कमी करण्यात आले होते, द प्रिंटच्या वृत्तानुसार पंतप्रधानांना भेटणाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली होती, जे भेटायला जात होते, त्यांना २४ तास आधी आरटी-पीसीआर चाचणी करावी लागत होती.

अधिकाऱ्यांसोबतही पंतप्रधानांच्या प्रत्यक्ष भेटी कमीत कमी आणि आवश्यकतेनुसार आयोजित केल्या जात होत्या. कॅबिनेट मंत्री किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत काही महत्त्वाच्या बैठका वगळता आता बहुतेक बैठका व्हर्चुअरल घेतल्या जातात. सरकारी सूत्रांनुसार अधिकारीही जेव्हा गरज असेल तेव्हाच पंतप्रधानांना भेटत असतात.

मंत्री किंवा अधिकाऱ्यांच्या बैठकीतही थर्मल स्कॅनर, सेनिटायझेशन, तापमान तपासणे आणि सोशल डिस्टेंसिंगसारख्या प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाते. प्रत्येकाने मास्क घालणे अनिवार्य आहे. कोणत्याही बैठकीत पंतप्रधान आणि अधिकाऱ्यांमध्ये किमान १५-२० फूट अंतर ठेवले जाते असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

सूत्रांनी सांगितले की महामारीच्या काळात मोदींनी बराच काळ 7 लोककल्याण या निवासस्थानातून काम केले, जे पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आहे. पण, कोविड सुरक्षा उपायांमुळे मोदींना बाहेर पडण्यापासून रोखले नाही. सप्टेंबरमध्ये संपलेल्या संसदेच्या मॉन्सून अधिवेशनात ते उपस्थित होते.

अलीकडेच नरेंद्र मोदींनी बिहारमधील निवडणूक सभांना उपस्थिती लावली आहे. “आवश्यक असल्यास ते अधिकृत किंवा सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. पण व्हर्चुअल बैठकींना प्राधान्य दिले जाते असं सूत्रांनी सांगितले आहे. व्हर्चुअल बैठकीमुळे प्रवासाचा वेळ कमी झाल्याने कोविड काळात नरेंद्र मोदींचे कामकाज पूर्वीपेक्षा अधिक जास्त झालं आहे.

'आता जास्त बैठका होत आहेत, कारण त्या सर्व व्हर्चुअल आहेत'.देशव्यापी लॉकडाऊन राबविण्याच्या सुरुवातीच्या महिन्यांत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काही बैठका पंतप्रधानांच्या निवासस्थानी घेण्यात आल्या."पण नंतर त्या बंद करण्यात आल्या आणि आता मंत्रिमंडळाच्या बैठकादेखील व्हर्चुअलच्या माध्यमातून होत आहेत असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पंतप्रधानांना एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चेसाठी बोलायचे असेल तर त्या संबंधित मंत्र्यांना व्हर्चुअल मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या निवासस्थानी उपस्थित रहाण्याचे आमंत्रण दिले जाते. त्याचसोबत पंतप्रधानांच्या बातम्या कव्हर करणारे दूरदर्शनचे वार्ताहर आणि कॅमेरामन ज्यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी जावे लागते, त्यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवले होते.

सरकारी सूत्रांनी सांगितले की, या टीमलाही आरटी-पीसीआर चाचणी करावी लागत होती, याशिवाय बाहेरील कोणत्याही व्यक्तीला भेटण्याची परवानगी या लोकांना दिली जात नव्हती. तसेच त्यांना त्यांच्या कार्यालयात जाण्याची देखील गरज नव्हती.

भारतात कोविड -१९ संकटात मोदी सरकारमधील गृहमंत्री अमित शहा, रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी, जल ऊर्जामंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासह किमान डझनभर मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही महिन्यांत बरेच उच्च सरकारी अधिकारी कोविड १९ पॉझिटिव्ह असल्याचेही आढळले आहे.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठीही कोविड १९ च्या नियमांची कडेकोट अंमलबजावणी करण्यात आली. राष्ट्रपती भवनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "विशेष म्हणजे राष्ट्रपतींसोबत प्रत्यक्ष भेटी कमीतकमी करण्यात आल्या आहेत. आम्ही इतर कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे अनुसरण करीत आहोत, जसे की सोशल डिस्टेंसिंग वारंवार स्वच्छता करणे आणि तापमान तपासणे अशाप्रकारे काळजी घेत आहोत.