सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिलिगुडीच्या 'ऑक्सिलियम कॉन्व्हेंट स्कूल'चा दहावीचा विद्यार्थी दिब्येंदु प्रामाणिक याने आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या परीक्षेत ५०० पैकी ४९९ गुण मिळवले आहेत. दिब्येंदुने संपूर्ण भारतातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र त्याची आई बानी प्रामाणिक शर्मा, ज्या स्वतः एक शिक्षिका आहेत, यांनी आपल्या मुलाने पूर्ण गुण मिळवण्याची संधी हुकवल्याबद्दल अभिमान आणि निराशा अशी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे.
दिब्येंदुच्या आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आई म्हणते, "मला वाईट वाटत आहे... जर त्याला आणखी एक मार्क मिळाला असता तर जास्त चांगलं झालं असतं. जर त्याने आणखी थोडा अभ्यास केला असता, तर कदाचित आज तो एक मार्क कमी पडल्याचं दुःख आम्हाला झालं नसतं."
इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला जवळपास ५० हजार लाईक्स आणि ३ हजारांहून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच, नेटीझन्सनी आईच्या या 'कडू-गोड' प्रतिक्रियेची दखल घेतली आणि कमेंट बॉक्समध्ये काहींनी आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. एका युजरने म्हटलं, "असे आई-वडील कोणालाही मिळू नयेत" या कमेंटला १६,००० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
दुसऱ्या एका युजरने "माझा मुलगा म्हातारपणी माझ्याशी का बोलत नाही?" असा टोमणा मारत कोट पोस्ट केला, ज्याला ७,००० हून अधिक लाईक्स मिळाले. याच दरम्यान अनेक युजर्सनी आईच्या या वागण्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओमध्ये दिब्येंदु म्हणाला, "तो एक मार्क कमी पडल्याचं मला वाईट वाटतंय, पण ठीक आहे. माझी कामगिरी चांगली झाली आहे."
दिब्येंदु त्याला इंजिनिअर व्हायचं असून आयआयटी (IIT) प्रवेश परीक्षेची तयारी करणार असल्याचंही त्याने नमूद केलं. काही युजर्सनी यावर चिंता व्यक्त करताना म्हटलं की, "पालकांनी मुलावर किती मानसिक दडपण आणलं असेल, याची मी कल्पना करू शकतो," तर काहींनी म्हटले, "त्याला ४९९ गुण मिळाले आहेत आणि ती आई केवळ त्या एका हरवलेल्या गुणावर लक्ष केंद्रित करत आहे." सर्वत्र या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
