"तुमच्याकडे किती ताटं आहेत..."; अक्षय खन्नाचा प्रॉडक्शन टीमसोबत जेवणावरुन वाद, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 16:35 IST2026-05-10T16:33:22+5:302026-05-10T16:35:14+5:30
पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारा अक्षय खन्ना खऱ्या आयुष्यात त्याच्या शांत आणि गंभीर स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र, एका चित्रपटाच्या सेटवर अक्षयला एकदा इतका राग आला की त्याने चक्क निर्मात्याचीच शाळा घेतली

"तुमच्याकडे किती ताटं आहेत..."; अक्षय खन्नाचा प्रॉडक्शन टीमसोबत जेवणावरुन वाद, नेमकं काय घडलं?
'धुरंधर' चित्रपटामध्ये रहमान नावाच्या 'रहमान डकैत'ची भूमिका साकारल्यानंतर अभिनेता अक्षय खन्ना सध्या प्रचंड चर्चेत आहे. पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारा अक्षय खन्ना खऱ्या आयुष्यात त्याच्या शांत आणि गंभीर स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र, एका चित्रपटाच्या सेटवर अक्षयला एकदा इतका राग आला की त्याने चक्क सेटवरील सदस्याची शाळा घेतली.
अपमानावर अक्षय खन्ना संतापला
अमित बहल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, एकदा एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय खन्ना आणि मुख्य कलाकार एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र, त्याच चित्रपटातील एक छोटा सह-कलाकार दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबला होता. एके दिवशी तो सह-कलाकार लंचसाठी मुख्य टीम थांबलेल्या हॉटेलमध्ये आला. त्याने जेवणासाठी प्लेट उचलली आणि पहिला घास घेणार इतक्यात प्रॉडक्शन टीममधील एका सदस्याने त्याला अडवले. हा सदस्य निर्मात्याचा नातेवाईक होता.
त्या सदस्याने त्या कलाकाराला सर्वांसमोर अडवलं आणि म्हणाला की, "सर, तुम्ही इथले पाहुणे नाही आहात, त्यामुळे इथे जेवू शकत नाही." हे ऐकून त्या कलाकाराला खूप वाईट वाटले आणि त्याने आपली प्लेट बाजूला ठेवली व तो एका कोपऱ्यात जाऊन बसला.
अक्षय खन्ना हे सर्व लांबून पाहत होता. एरवी शांत राहणाऱ्या अक्षयचा पारा चढला आणि त्याने तात्काळ तिथे आवाज उठवला. अक्षय निर्मात्यावर ओरडत म्हणाला, "कोणताही चित्रपट तुमच्याकडे किती ताटं आहेत किंवा किती जेवण आहे यावर बनत नाही, तर तो लोकांच्या आशीर्वादाने बनतो." या एका वाक्याने अक्षयने निर्मात्याची बोलती बंद केली. अक्षय खन्ना आपल्या सह-कलाकारांचा किती आदर करतो, हे या प्रसंगातून सर्वांना कळून आलं.