थलापती विजयनंतर आता दिलजीत दोसांझ राजकारणात येणार? थेट खुलासा करत दिला मोठा झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 17:51 IST2026-05-10T17:35:08+5:302026-05-10T17:51:12+5:30
थलापती विजयनंतर आता दिलजीत दोसांझ पंजाबच्या राजकारणाचा चेहरा-मोहरा बदलणार? राजकीय प्रवेशावर म्हणाला...

थलापती विजयनंतर आता दिलजीत दोसांझ राजकारणात येणार? थेट खुलासा करत दिला मोठा झटका
Diljit Dosanjh Political Entry : दक्षिणेतील प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तामिळनाडूच्या राजकारणात सिनेसृष्टी आणि राजकारण यांचा खूप जुना आणि घट्ट संबंध आहे. पडद्यावरचा 'नायक' खऱ्या आयुष्यातही लोकांचा 'नेता' बनण्याचा पॅटर्न तामिळनाडूने अनेकदा पाहिला आहे. याच पद्धतीने पंजाबच्या राजकारणात बॉलिवूड आणि पंजाबी सिनेसृष्टीचा 'रॉकस्टार' दिलजीत दोसांझ एक नवा चेहरा म्हणून समोर येऊ शकतो, अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. या सर्व चर्चांवर आता स्वतः दिलजीतने मौन सोडलं आहे.
'पंजाबी ट्रिब्यून'ने प्रसिद्ध केलेल्या एका लेखात दिलजीतच्या राजकीय प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. ही पोस्ट शेअर करत दिलजीतने स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. तो म्हणाला, "कधीच नाही... माझं काम लोकांचं मनोरंजन करणं आहे. मी माझ्या क्षेत्रात खूप आनंदी आहे. या चर्चांसाठी खूप खूप धन्यवाद". या उत्तरामुळे दिलजीतला राजकारणात अजिबात रस नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
Kadey v Nhi..
— DILJIT DOSANJH (@diljitdosanjh) May 9, 2026
Mera Kam Entertainment Karna
Am Very Happy in My Field
Thank You So Much 🙏🏽 https://t.co/VWMAC8d98q
केवळ गाणी आणि अभिनयापुरता मर्यादित न राहता, दिलजीत दोसांझने अनेकदा आपल्या कृतीतून हे सिद्ध केले आहे की तो जमिनीशी जोडलेला कलाकार आहे. पंजाबवर जेव्हा जेव्हा संकट आलं, तेव्हा दिलजीतने केवळ सोशल मीडियावर पोस्ट न टाकता प्रत्यक्षात मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
सामाजिक प्रश्नांवर नेहमीच आक्रमक
दिल्लीच्या सीमेवर झालेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनादरम्यान दिलजीतने उघडपणे शेतकऱ्यांची बाजू घेतली. गेल्या वर्षी पंजाबमध्ये जेव्हा पावसाने आणि पुराने थैमान घातले होते, तेव्हा दिलजीतने आपले सार्वजनिक व्यासपीठ केवळ मदतीचे आवाहन करण्यासाठी वापरले नाही, तर बचाव कार्यासाठी आवश्यक ती सर्व मदत पोहोचवली. पंजाबमधील अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येवर दिलजीतने नेहमीच चिंता व्यक्त केली आहे. दिलजीतने परदेशातील मोठ्या व्यासपीठांवर पंजाबी संस्कृतीचा गौरव केला आहे.