Arnab Goswami BJP Connection: अर्णब गोस्वामी आणि भाजपाचं 'फॅमिली कनेक्शन'?... जाणून घ्या

By प्रविण मरगळे | Published: November 5, 2020 12:51 PM2020-11-05T12:51:35+5:302020-11-05T12:58:36+5:30

राज्य अन् देशभरात सध्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर कायद्यानुसार अर्णबवर कारवाई झाल्याचं ठाकरे सरकार सांगत आहे.

अर्णब गोस्वामी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हे नाव प्रखरतेने जाणवू लागलं आहे. टीव्ही पत्रकारितेलं या नावाची चर्चा राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून जास्तच सुरु झाली, याला कारणही तसेच आहे. राज्यात १०५ आमदार निवडूनही शिवसेनेने भाजपाची साथ सोडत थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर भाजपाकडून शिवसेनेला कोडींत पकडण्याचे अनेक प्रयत्न होताना दिसत आहे.

शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा आरोप भाजपाकडून केला जातो, यातच पालघर येथे मॉब लिचिंग घटनेत २ साधूंची हत्या करण्यात आली. या घटनेवरुन भाजपाने शिवसेनेविरोधात रान उठवलं, हिंदू साधूंची हत्या झाली ही बातमी वेगाने पसरली, यात शिवसेनेला आक्रमकपणे घेरण्यासाठी अर्णब गोस्वामी यांची रिपब्लिक टीव्ही सज्ज झाली.

पालघर साधू हत्याकांड, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या, कंगना राणौत, बॉलिवूड ड्रग्स प्रकरण एका मागोमाग एक घटनेवरुन अर्णब गोस्वामीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंवर एकेरी भाषेत उल्लेख करून टीका केली, मागील काही महिने उद्धव ठाकरे सरकारविरोधात अर्णब गोस्वामीने रान उठवलं होतं. आव्हानाची भाषा वापरली.

पण याच दरम्यान २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक आणि त्यांची आई यांच्या आत्महत्येची चौकशी पुन्हा करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आदेश दिले, अन्वय नाईक प्रकरणात सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख आहे, आर्थिक बिले दिले नसल्याने अन्वय नाईक यांनी आत्महत्या केल्याचं या सुसाईड नोटमधून स्पष्ट होतं,

बुधवारी रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामीला या प्रकरणात अटक केली, त्यानंतर राज्यासह देशभरात भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन केले. अर्णबला एका वैयक्तिक गुन्ह्यात अटक झाली असून त्याचा पत्रकारितेची काही संबंध नाही, त्यामुळे अर्णबसाठी रडणं बंद करा असा टोला शिवसेनेने लगावला. अर्णब भाजपाचा कार्यकर्ता आहे का? असा सवाल उपस्थित केला.

या प्रश्नावर अर्णब गोस्वामीच्या इतिहासाबाबत माहिती काढली. अर्णबचा जन्म ९ ऑक्टोबर १९७३ रोजी आसामच्या गुवाहाटी येथे झाला, अर्णबचे वडील मनोरंजन गोस्वामी हे सेवानिवृत्त कर्नल आहेत, नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर अर्णबच्या वडिलांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता.

इतकचं नाही तर मनोरंजन गोस्वामी यांनी १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत गुवाहाटी मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढली होती, या निवडणुकीत काँग्रेसच्या भुवनेश्वर कलिता यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता, मनोरंजन गोस्वामी यांना या निवडणुकीत २७ टक्के मतदान झालं होतं.

अर्णब गोस्वामी यांचे मामा सिद्धार्थ गोस्वामी हेदेखील भाजपाशी जोडलेले आहेत. ते भाजपाचे आमदार असून आसाम सरकारमध्ये शिक्षणमंत्री आहेत. १९९५ मध्ये सिद्धार्थ भट्टाचार्य भाजपात सहभागी झाले होते, २०१६ मध्ये त्यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष बनवले होते.

अर्णबने १९९५ मध्ये पत्रकारितेला सुरुवात केली, द टेलिग्राफ, एनडीटीव्ही, टाईम्स नाऊ आणि त्यानंतर रिपब्लिक टीव्ही संपादक असा अर्णब गोस्वामीचा प्रवास राहिला आहे. २०१६ मध्ये अर्णब गोस्वामी यांनी टाईम्स नाऊमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर २०१७ मध्ये रिपब्लिक टीव्ही सुरु केला, याच रिपब्लिक टीव्हीच्या स्टुडिओ कामानिमित्त अन्वय नाईक आणि अर्णब गोस्वामी यांचा संबंध आला होता.

Read in English