शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 17:25 IST

1 / 15
West Bengal Assembly Election 2026 Result: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे हाती येत असलेले कल संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. आतापर्यंत जे कल हाती आले आहेत, त्यानुसार भाजपाने एकहाती बहुमत मिळवले असून, ममता बॅनर्जी यांचे सरकार कोसळत असल्याचे चित्र आहे.
2 / 15
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील भाजपाची कामगिरी ऐतिहासिक मानली जात आहे. याची कारणेही अनेक आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली असली तरी गेल्या १० ते १२ वर्षांपासून भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते घेत असलेल्या मेहनतीचा हा परिपाक असल्याचे म्हटले जात आहे.
3 / 15
गेल्या १५ वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची एकहाती सत्ता होती. भाजपाने पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या १५ वर्षांच्या राजवटीतील त्रुटींचा पुरेपूर फायदा उठवला. ममता दीदींशी वैयक्तिक पातळीवर दोन हात करण्याऐवजी, भाजपाने बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि प्रशासकीय कारभार यांसारख्या मुद्द्यांचा वापर करून परिस्थिती आपल्या बाजूने वळवली.
4 / 15
दुसरीकडे TMC ने निवडणूक आयोगावर टीका करण्यावर लक्ष केंद्रित केले. मतदार याद्यांच्या SIR मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले; मात्र हा मुद्दा मतदारांना फारसा भावला नाही. त्यानंतर मतदानानंतर समोर आलेले बहुतांश एक्झिट पोलचे अंदाजही पश्चिम बंगालमध्ये भाजपा सत्तेत येईल, असेच आकडे दर्शवत होते. तेच आता खरे होताना दिसत आहेत.
5 / 15
तृणमूलने भाजपावर केवळ एक 'उत्तर भारतीय पक्ष' म्हणून निशाणा साधला. भाजपाला बंगाली संस्कृती आणि परंपरांची काहीच जाण नाही. भाजपाने जर सत्ता हाती घेतली, तर ते बंगालींच्या खाण्यापिण्याच्या सवयींना लक्ष्य करतील, असे अनेक दावे या निवडणुकीच्या प्रचारावेळी करण्यात आले आहेत. परंतु, भाजपाने सदर दावे खोडून काढण्यावर अधिक भर दिला. याचे चित्र निवडणूक निकालातून समोर पाहायला मिळत आहे.
6 / 15
गेल्या १० वर्षांत, TMC ने महिलांसाठी व्यापक कल्याणकारी योजना राबवल्या; यामध्ये 'लक्ष्मी भंडार' या थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेपासून ते 'कन्याश्री' योजनेपर्यंतच्या उपक्रमांचा समावेश आहे. दुसरीकडे, भाजपाने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रमुख बनवला. तसेच जाहीरनाम्यात दरमहा ३ हजारांची आर्थिक मदत, मोफत बस प्रवास, सरकारी नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण आणि पोलीस स्थानके व ‘दुर्गा सुरक्षा पथके’ यांसारख्या महिलांच्या सुरक्षेसाठीच्या विशेष उपाययोजनांचे आश्वासन दिले.
7 / 15
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सामान्य विक्रेत्याकडे जाऊन झालमुडी विकत घेतली. त्याला त्याचे पैसेही दिले. याचा मोठा प्रभाव मतदारांवर झाल्याचे पाहायला मिळाले. महिला आरक्षण तसेच मतदार पुनर्रचना विधेयक संसदेत मंजूर होऊ शकले नाही. हे विधेयक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणले, असा दावा विरोधकांनी केला होता. परंतु, विरोधकच कसे महिला आरक्षणाच्या विरोधात आहे, हे मतदारांवर ठसवण्याचा भाजपाने जोरकस प्रयत्न केला. त्याचाही परिणाम या निवडणुकीवर झाल्याचे म्हटले जात आहे.
8 / 15
एके काळी शुभेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांचे निकटचे सहकारी होते. परंतु, पक्ष बदलल्यानंतर आता अधिकरी हे भाजपा नेते आणि ममता दीदींचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी बनले. भाजपा आपल्या विजयाचे काही श्रेय शुभेंदू अधिकारी यांना देऊ शकते; कारण त्यांनी भवानीपूर मतदारसंघात विद्यमान मुख्यमंत्र्यांविरुद्ध थेट लढा दिला. भवानीपूरमधून शुभेंदू अधिकारी यांना उमेदवारी देणे हा भाजपाच्या रणनीतीचा एक भाग होता. त्यामुळे ममता दीदींना स्वतःच्या मतदारसंघात अधिक वेळ घालवणे भाग पडले.
9 / 15
भाजपाने या निवडणुकीत कमल मेला रूपात एक अनोखा प्रयोग केला. हा केवळ एक राजकीय कार्यक्रम नव्हता, तर एक सामाजिक-राजकीय उत्सव होता, ज्याने राजकारणाला सामान्य लोकांच्या जीवनाशी जोडले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या या मेळ्यांनी पक्षाला एक वेगळी ओळख दिली.
10 / 15
पश्चिम बंगालमध्ये फुटबॉल हा केवळ एक खेळ नाही, तर ती एक भावना आहे. भाजपाने ही भावना ओळखली आणि तिचा आपल्या रणनीतीत समावेश केला. तरुणांशी थेट संवाद साधण्यासाठी राज्यभरात फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या सामन्यांमुळे एकाच वेळी संवाद, तरुणांपर्यंत विचार पोहोचवणे आणि संदेशन सुलभ झाले.
11 / 15
या संपूर्ण मोहिमेचा सर्वात प्रभावी पैलू कोणता होता, तर तो म्हणजे अंगण सभा. फेब्रुवारीमध्ये परीक्षांमुळे प्रचारावर मर्यादा आल्या तेव्हा, भाजपाने या आव्हानाचे संधीत रूपांतर केले. केवळ एका महिन्यात, १,६५,००० हून अधिक घरोघरी सभा आयोजित करण्यात आल्या. प्रत्येक बूथवर लोकांचे छोटे गट तयार झाले. सहभागींना जोडण्यासाठी आणि सतत संवाद सुनिश्चित करण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले.
12 / 15
जानेवारी ते प्रचार संपेपर्यंत १२,००० हून अधिक ठिकाणी नुक्कड सभा घेण्यात आल्या. या छोट्या सभांनी मोठ्या व्यासपीठांच्या अभावाची उणीव भरून काढली. त्यांनी थेट संवादाला चालना दिली, स्थानिक प्रश्न मांडले. स्थानिक लोकांपर्यंत पक्षाचा संदेश पोहोचवला. या मॉडेलने निवडणुकांना एका जनआंदोलनात रूपांतरित केले.
13 / 15
भाजपाच्या उमेदवारांच्या निवडीतही एक मोठा बदल दिसून आला. डॉक्टर, वकील, खेळाडू, कलाकार आणि स्थानिक प्रतिष्ठित व्यक्तींना प्राधान्य देण्यात आले. बाहेरच्यांपेक्षा स्थानिक नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यात आले. या धोरणामुळे बाहेरचे विरुद्ध स्थानिक हा वाद मोठ्या प्रमाणात संपुष्टात आला. तसेच तरुण आणि महिलांना जोडण्यासाठी युवा शक्ती भरोसा कार्ड आणि मातृ शक्ती भरोसा कार्ड या मोहिमा सुरू करण्यात आल्या. या मोहिमांमुळे थेट संवाद प्रस्थापित झाला आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.
14 / 15
प्रत्येक निवडणुकीत एक घोषणा असते, पण बंगालमध्ये ही घोषणा एक भावना बनली: 'बाचते चाईं, बीजेपी ताई' हा संदेश लोकांमध्ये वेगाने पसरला. प्रत्येक मुलाच्या ओठांवर असलेली ही घोषणा निवडणुकीचे वातावरण बदलण्यात निर्णायक ठरली. निवडणुकीचे चित्र निर्माण करण्यात ही घोषणा कोणत्याही मोठ्या निवडणूक आश्वासनाइतकीच प्रभावी ठरली, असे म्हटले जात आहे.
15 / 15
पश्चिम बंगालच्या राजकारणात जे घडले, तो केवळ एक निवडणुकीतील विजय नव्हता, तर एका सुनियोजित आणि बारकाईने आखलेल्या प्रचार मोहिमेचा परिणाम होता. दीर्घकाळ कठीण मानला जाणारा भाजपाचा बहुमताचा मार्ग केवळ मोठ्या सभांवर अवलंबून नव्हता, तर प्रत्येक गल्ली, प्रत्येक मतदान केंद्र आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचणाऱ्या रणनीतीमुळे साकार झाला, असे म्हटले जात आहे.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Assembly Electionविधानसभा निवडणूक २०२६west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहAssembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६