Corona Vaccination : अरे व्वा! देशातील 'या' ठिकाणच्या सर्व नागरिकांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 12:48 PM2021-07-17T12:48:46+5:302021-07-17T13:01:42+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील लाखो लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे. अशातच एक सकारात्मक घटना समोर आली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38,079 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 560 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाचा वेग थोडा मंदावताना दिसत आहे. कोरोना लसीकरण मोहीम देखील वेगाने सुरू करण्यात आली आहे.

देशातील लाखो लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे. अशातच एक सकारात्मक घटना समोर आली आहे. लडाख हा नागरिकांचं लसीकरण पूर्ण करणारा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे.

लडाखमधील सर्वच्या सर्व लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. लडाखमध्ये स्थानिक नागरिकांचं तसेच बाहेरच्या प्रदेशातून आलेल्या अनेक नागरिकांनीही लसीकरणाचा लाभ घेतला आहे

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्व प्रवासी मजूर, हॉटेल कर्मचारी तसेच नेपाळी नागरिकांसहीत येथे येऊन पोटापाण्यासाठी काम करणाऱ्या सर्व नागरिकांना लसीचे डोस देण्यात आलेले आहेत.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दुसर्‍या टप्प्यात लडाखमध्येही लसीकरणाचा रेकॉर्ड होणार आहे. दुसर्‍या टप्प्यात सुमारे 66 टक्के लोकांना लस देण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचं यामध्ये मोठं यश आले आहे.

लेह कारगिल शहरांसह, आरोग्य कर्मचारी दुर्गम भागातील लोकांना लसीकरण करण्यासाठी पर्वत, नद्या, नाले ओलांडत आहेत. लडाखच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, लडाखने 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या 89,404 लोकांना लस दिली असून पहिल्या टप्प्यात 100% लसीकरणाचे लक्ष्य गाठले आहे.

लडाखची लोकसंख्या कमी असली तरी आपल्या भौगोलिक रचनेमुळे सर्व नागरिकांपर्यंत पोहचणं हे प्रशासनासाठी आव्हानात्मक होत. दुर्गम भाग, हवामान आणि डोंगराळ भागामुळे नागरिकांपर्यंत पोहचणं थोडं कठीण होत आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना लसीचे 41.10 कोटी डोस दिले गेले आहेत. लवकरच त्यांना आणखी 52 लाख डोस मिळणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. मात्र असं असलं तरी काही ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना लोकांचा निष्काळजीपणा हा जीवघेणा ठरू शकतो. आठ राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटने सरकारचं टेन्शन वाढवलं आहे. धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार. तपासणीमध्ये जर पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर तेथील संक्रमण हे नियंत्रणाबाहेर आहे. तर केरळचा प़ॉझिटिव्हिटी रेट हा 10.5 टक्के आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील तब्बल 73 जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा 10 टक्के झाला आहे. ज्यातील 45 जिल्हे हे पूर्वोत्तर राज्यातील आहेत. यामुळेच तज्ज्ञांची विशेष टीम या राज्यांत पाठवण्यात आली आहे.

सिक्किम - 19.5%, मणिपूर - 15%, मिझोरम - 11.8%, केरळ - 10.5%, मेघालय - 9.4, अरुणाचल प्रदेश - 7.4%, नागालँड - 6%, त्रिपुरा - 5.6% या राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटने चिंता वाढवली आहे.