लडाख बॉर्डरवर तैनात चीनी सैनिकांना क्षी जिनपिंग यांचा व्हिडिओ कॉल, विचारलं की...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 06:25 PM2023-01-20T18:25:02+5:302023-01-20T18:31:46+5:30

चीनचे राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांनी पूर्व लडाख भागात भारत-चीन सीमेवर तैनात चीन सैनिकांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांच्याशी संवाद साधला. क्षी जिनपिंग यांनी सैनिकांना पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या मुख्यालयातून संबोधित केलं. जिनपिंग यांनी युद्धाच्या तयारीचा आढावा घेतला. चीनच्या सरकारी माध्यमानं याबाबतची माहिती दिली आहे.

पूर्व लडाख स्थित भारत-चीनची सीमा दुर्गम भागापैकी एक आहे. या ठिकाणी थंडीच्या काळात तापमान शून्य ते २०-३० डीग्री तापमान असतं. या भागात भारत आणि चीनचे हजारो सैनिक तैनात आहेत. अरुणाचल प्रदेशात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये नुकतंच वादावादी झाल्याची घटना ताजी असतानाच जिनपिंग यांनी चीनी सैनिकांशी संवाद साधला.

क्षी जिनपिंग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. चीनच्या सरकारी मीडियाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की, जिनपिंग यांनी या ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांना सांगितले की, 'हा भाग अलीकडच्या काळात सतत बदलत आहे' आणि या बदलाचा लष्करावर कसा परिणाम झाला आहे याची चर्चा केली.

सैनिकांशी झालेल्या संवादादरम्यान जिनपिंग यांनी चिनी सैनिक युद्धासाठी किती तयार आहेत याचाही आढावा घेतला. चिनी एजन्सींच्या मते, एका सैनिकाने जिनपिंग यांना सांगितले की ते २४ तास सीमेवर दक्षतेने लक्ष ठेवून आहेत.

चीनचं नवीन वर्ष सुरू होणार आहे. यानिमित्ताने जिनपिंग चीनच्या सैनिकांशी संवाद साधत आहेत. जिनपिंग पीएलए, पीपल्स सशस्त्र पोलीस दल आणि सैन्यात तैनात असलेल्या नागरिक, राखीव सैनिकांची भेट घेत आहेत आणि त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, जिनपिंग यांनी खुंजरेबमधील सीमेवर तैनात असलेल्या चिनी सैनिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.

चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी सैनिकांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना या हंगामात इतक्या दुर्गम ठिकाणी ताजी भाजी मिळते का हे जाणून घ्यायचे होते. चीनच्या अधिकृत माध्यमांनी वृत्त दिले आहे की क्षी जिनपिंग यांनी सीमेवरील सैनिकांना "त्यांच्या सीमेवरील गस्त आणि व्यवस्थापन कार्याबद्दल" विचारले. यासोबतच जिनपिंग यांनी आपल्या सैनिकांना प्रयत्न करत राहण्यासाठी आणि नवीन योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केले.

क्षी यांनी सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्याचे राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक स्थैर्याचे रक्षण करण्याचे आवाहन केले, जेणेकरून सर्व चीनी लोक आनंदी आणि सुरक्षित वसंतोत्सव साजरा करू शकतील. पूर्व लडाख हा असा प्रदेश आहे जिथे ५ मे २०२० रोजी पॅंगॉन्ग सरोवर परिसरात झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष सुरू झाला.

१५ जून २०२० रोजी चीनी सैनिकांनी गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर विश्वासघातकी हल्ला केला. चीनने केलेल्या या दगाबाजीत भारताचे कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहीद झाले.

चिनी सैनिकांनी हा हल्ला अचानक भारताच्या सैनिकांवर केला होता. तरीही त्याला सडेतोड उत्तर भारतीय सैनिकांनी दिले होते. भारतीयांनी केलेल्या प्रत्युत्तरात ३० हून अधिक चिनी सैनिक मारले गेले. जरी चीनने सुरुवातीला आपल्या सैनिकांचा मृत्यू मान्य केला नाही. मात्र अनेक महिन्यांनंतर चीनने या हल्ल्यात आपले ५ सैनिक मारले गेल्याचे मान्य केले होते.