"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 14:32 IST2026-05-14T14:32:06+5:302026-05-14T14:32:51+5:30
"आम्ही सर्वांचे परदेश दौरेही रद्द केले आहेत. आम्ही ज्या-ज्या ठिकाणी विदेशी पुद्रा अथवा परकीय चलन, प्रेट्रोल डिझेल वाचवू शकतो, ते वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करू."

"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. संपूर्ण जगावरच या युद्धाचा परिणाम जाणवत आहे. भारतही यापासून अलिप्त राहिलेला नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल, डिझेलसह इंधनबचतीचे आवाहन केले. विदेशी मुद्रा अथवा परकीय चलन वाचवणे हा यामगचा खरा उद्देश आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनीही आपल्या वाहनांच्या ताफ्यात लक्षणीय कपात केली आहे. यानंतर आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही गाड्यांचा ताफा बाजूला सारून दुचाकीवरून विधानभवनात पोहोचले. दरम्यान, "पंतप्रधानांचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचावा यासाठी एक प्रयत्न म्हणून ही कृती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात फार मोठ-मोठे कार्यक्रम सरकारकडून आयोजित केले जाणार नाहीत," अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस -
यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, "मी आज बाईकने जो काही प्रवास करत आहे. पंतप्रधानांचा संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी एक प्रयत्न म्हणून हे करत आहे. खरे तर आम्ही आमचा तफाही छोटा केला आहे. तो आणखी छोटा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आम्ही सर्वांचे परदेश दौरेही रद्द केले आहेत. आम्ही ज्या-ज्या ठिकाणी विदेशी मुद्रा अथवा परकीय चलन, पेट्रोलडिझेल वाचवू शकतो, ते वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करू."
पुढील सहा मोठे कार्यक्रम नाही -
फडणवीस पुढे म्हणाले, "पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात फार मोठ-मोठे कार्यक्रम सरकारकडून आयोजित केले जाणार नाहीत. केवळ उद्याच, आम्ही साताऱ्यात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जो प्रधानमंत्री आवास योजनेचा आहे. आणि १० हजार थेट आपल्या लोकांच्या खात्यात जाणार आहेत. त्यामुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आलेला नाही." मात्र उद्यानंतर, आम्ही कुठलेही मोठे कार्यक्रम करणार नाही, असेही फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.
पंतप्रधानांनीही कृतीतून दिला संदेश -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केल्यानंतर, स्वत:हा ही गोष्ट अमलात आणली आहे. नागरिकांना इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करण्यास सांगितल्यानंतर, काही दिवसातच आपल्या वाहनांच्या ताफ्यातही लक्षणीयरीत्या कपात केली. यानंतर, भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री आणि नेत्यांनीही अशा काही उपाययोजना करायला सुरुवात केली.
माध्यमांतील वृत्तांनुसार, पंतप्रधानांच्या अलीकडील देशांतर्गत दौऱ्यांतील त्यांच्या ताफ्याचे आकारमान कमी करण्यात आले आहे. एसपीजीच्या सुरक्षा प्रोटोकॉलनुसार आवश्यक सुरक्षा व्यवस्था कायम ठेवून ही कपात करण्यात आली आहे.