Air India घरवापसीचे TATA चे स्वप्न भंगणार? निर्गुंतवणुकीविरोधात भाजप नेत्याची हायकोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 01:21 PM2022-01-04T13:21:54+5:302022-01-04T13:27:44+5:30

Air India निर्गुंतवणूक प्रक्रियेची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका भाजप नेत्याने दिल्ली हायकोर्टात केली आहे.

तब्बल ६० दशकानंतर Air India ची TATA ग्रुपमध्ये घरवापसी होत आहे. डबघाईला आलेली सरकारी विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाची टाटा समूहाने खरेदी केली. या व्यवहाराला भारतीय स्पर्धा आयोगाने मंजुरी दिली आहे.

सरकारी पातळीवरूनही Air India चे हस्तांतरण TATA ग्रुपकडे सोपवण्याच्या प्रक्रिया वेगाने करून जास्तीत जास्त लवकर अधिग्रहण होण्यावर भर दिला जात आहे. TATA नेही अधिग्रहणानंतर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेला सुरुवात केली असून, मोठे प्लान तयार केले आहेत.

इतकेच नव्हे तर व्यवस्थापकीय संचालक, अन्य अधिकारी यांचीही जुळवाजुळव TATA ने सुरू केली आहे. जानेवारी २०२२ मध्ये Air India ची कमान TATA ग्रुपकडे सोपवली जाणार होती. मात्र, यासाठी केल्या जाणाऱ्या प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे अधिग्रहणाला आणखी काही काळ लागू शकतो, असे सांगितले जात आहे.

या सर्व घडामोडी सुरू असताना दुसरीकडे मात्र Air India च्या हस्तांतरण प्रक्रियेविरोधात भाजप नेत्याने दिल्लू उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, ही प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी केली आहे. यामुळे आता एअर इंडियाच्या घरवापसीचे TATA चे स्वप्न भंगणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Air India च्या निर्गुंवतणूक प्रक्रियेसंदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानग्या, मंजुरी रोखण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. ज्योति सिंह यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी Air India च्या सध्याच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेच्या संदर्भात पुढील कोणतीही कारवाई किंवा निर्णय किंवा अधिकाऱ्यांनी घेतलेली मान्यता किंवा परवानगी रद्द करण्याची विनंती आपल्या याचिकेतून उच्च न्यायालयाला केली आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांच्यातर्फे वकील सत्यपाल सबरवाल उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. तसेच या प्रक्रियेसंदर्भातील अधिकाऱ्यांची भूमिका आणि कार्यशैली यांची सीबीआय चौकशी करावी आणि या प्रकरणी एक विस्तृत रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश द्यावेत, असेही याचिकेत म्हटले आहे.

टाटा सन्सची मालकी असलेल्या टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने Air India खरेदीसाठी बोली लावली होती. एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअर इंडिया एसएटीएस एअरपोर्ट सर्विसेसच्या खरेदीसाठी टाटा समूहाने लावलेली १८ हजार कोटी रुपयांची बोली विजयी ठरली होती.

Air India च्या कर्जासाठी १८ हजारे कोटी रुपये आणि प्रारंभिक परिचालन खर्चासाठी ५ हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे कंपनीने सांगितले होते. Air India आर्थिक अडचणीत होती आणि त्यामुळे सरकारला त्याचे खाजगीकरण करावे लागले. आता टाटांच्या हाती Air India जाताच बँकांनी कर्ज देण्यास सुरुवात केली आहे.

अहवालात असेही सांगण्यात आले आहे की ज्या बँकांनी टाटाच्या कंपनीला स्वस्त कर्ज देण्याची ऑफर दिली आहे त्यात एसबीआय, पीएनबी, बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. या बँकांनी ३ हजार कोटी रुपयांपासून १२ हजार कोटी रुपयांपर्यंत कर्ज ऑफर केले आहे.

TATA च्या टॅलेसने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली होती, जी सर्वात मोठी बोली ठरली. या १८ हजार कोटी रुपयांपैकी १५ हजार ३०० कोटी रुपये एअर इंडियाच्या जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी, तर २ हजार ७०० कोटी रुपये सरकारला रोख स्वरूपात द्यायचे आहेत.

Air India कडे आताच्या घडीला ५८ एअरबस, A320 फॅमिली विमाने, १४ बोइंग 777, २२ B787 ड्रीमलाइनर आणि AI एक्सप्रेसची २४ B737 एअरवर्थ असा विमानांचा भरगच्च ताफा आहे. हा सर्व ताफा TATA सन्सला मिळणार आहे.