TATA चा मंत्री, अधिकाऱ्यांना धक्का! Air India मधील उधारी बंद; कॅश द्या, तिकीट घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 10:52 AM2021-10-28T10:52:59+5:302021-10-28T10:57:35+5:30

TATA समूहाने केंद्रीय मंत्री आणि अधिकाऱ्यांना झटका दिला असून, Air India ने मंत्री आणि अधिकाऱ्यांची उधारीच बंद केली आहे.

अनेक महिन्यांनंतर अखेर Air India ची मालकी TATA समूहाकडे जाणार, यावर शिक्कमोर्तब झाले आहे. मात्र, Air India सारख्या आधीच हजारो कोटींचे कर्ज असलेल्या कंपनीचे संचालन TATA समूहाला सुलभ असणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. तब्बल ६८ वर्षांनी Air India ची TATA मध्ये घरवापसी होणार आहे.

यातच प्रचंड तोट्यात असलेल्या Air India चे संचालन आता मोदी सरकारला जड जात आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर Air India चे हस्तांतरण TATA कडे करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती मिळाली आहे. Air India ची हस्तांतरण प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

यातच आता हजारो कोटींचे कर्ज आणि कार्यपद्धतीत आलेल्या आळसाला दूर करण्यासाठी TATA समूहाने शिस्तबद्ध सुरुवात केली आहे. पहिल्याच निर्णयाने टाटा समूहाने केंद्रीय मंत्री आणि अधिकाऱ्यांना जबर झटका दिला आहे. Air India ने मंत्री आणि अधिकाऱ्यांची उधारीच बंद केली आहे.

यापुढे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आता Air India ने प्रवास करताना क्रेडीट फॅसिलिटी मिळणार नाही. तशा प्रकारचे निवेदन अर्थ मंत्रालयाने जारी केले आहे. एअर इंडियाने सन २००९ पासून भारत सरकारचे मंत्री आणि अधिकारी यांना आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासासाठी क्रेडीट फॅसिलिटी उपलब्ध करून दिली होती.

प्रवासानंतर तिकिटाची रक्कम एअर इंडियाला सरकारकडून काही दिवसांनी अदा केली जात असे. मात्र मागील काही वर्षीत या उधारीचा प्रचंड डोंगर वाढला. ज्यामुळे Air India ला तोटा देखील झाला होता.

नुकताच Air India चा लीलाव करण्यात सरकारला यश आले. TATA समूहाने एअर इंडियाची १८ हजार कोटींना खरेदी केली आहे. याबाबत दोन्ही बाजूने कराराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

TATA समूह सुशासन, शिस्तबद्धता आणि दर्जा यावर चालतो. मागील १०० वर्षांत टाटा समूहाने भारताच्या औद्योगिक विकासात आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यामुळे Air India ला पुन्हा गतवैभव मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

TATA समूहाने पूर्ण ताबा मिळवल्यानंतर एअर इंडियाच्या कार्यपद्धतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांना उधारीने प्रवास बंद करण्यात आला आहे.

अर्थ मंत्रालयाने एक निवेदन जारी केले असून, यामध्ये मंत्र्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना Air India ने हवाई प्रवास करण्यासाठी रोखीने तिकिटे खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, एअर इंडियाची एकूण १४१ विमाने TATA ला मिळणार आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ११८ विमाने उत्तमरित्या कार्यरत आहेत.

TATA सन्सला २३ विमानांची दुरुस्ती करावी लागणार आहे. Air India च्या विमानांची दुरुस्ती आणि देखभाल यासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी टाटा समूह Air India अधिग्रहणासाठी तब्बल १८ हजार कोटींचे कर्ज घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Air India कडे आताच्या घडीला ५८ एअरबस, A320 फॅमिली विमाने, १४ बोइंग 777, २२ B787 ड्रीमलाइनर आणि AI एक्सप्रेसची २४ B737 एअरवर्थ असा विमानांचा भरगच्च ताफा आहे. आताच्या घडीला Air India वर ६१ हजार ५६२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. यापैकी ७५ टक्के कर्ज टाटा समूहाकडे हस्तांतरण करण्यापूर्वी केंद्र सरकारच्या तिजोरीतून चुकते करण्यात येणार आहे.

TATA ग्रुप प्रचंड मोठा असून, टाटा सन्सला कर्ज घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगितले जात आहे. TATA समूह काही परदेशी बँका आणि निवडक स्थानिक बँकांशीही चर्चा करत आहे. परदेशी बँकांमध्ये स्टँडर्ड चार्टर्ड, सिटी, ड्यूश, जेपी मॉर्गन आणि बार्कलेज यांचा समावेश आहे.

TATA सन्स Air India च्या अधिग्रहणापूर्वी थोड्या कालावधीसाठी सल्लागारांची तुकडी तयार करत आहे. यात टाटा सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, ज्यात बोर्ड सदस्य, जागतिक उड्डाण तज्ज्ञ आणि एअर इंडियाचे काही उच्च अधिकारी असतील. एअर इंडियाचा समावेश असलेल्या गटासाठी निधी योजनांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Read in English