Operation Sindoor Live Updates: भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंची हॉटलाइनवर चर्चा होऊ शकली नाही

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 14:05 IST2025-05-07T07:21:37+5:302025-05-12T14:05:33+5:30

India Pakistan War Live Updates: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात मोठी कारवाई करत ५ धाडसी निर्णय घेतले. त्यात सिंधु जल कराराला ...

Operation Sindoor Live Updates: India strikes Pakistan, India Strikes Terror Camps in Pakistan, PoK after pahalgam terror attack | Operation Sindoor Live Updates: भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंची हॉटलाइनवर चर्चा होऊ शकली नाही

Operation Sindoor Live Updates: भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंची हॉटलाइनवर चर्चा होऊ शकली नाही

India Pakistan War Live Updates: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात मोठी कारवाई करत ५ धाडसी निर्णय घेतले. त्यात सिंधु जल कराराला स्थगिती देण्यात आली. २२ एप्रिलला झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा जीव गेला होता. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. दहशतवाद्यांना कुठल्याही किंमतीत सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. या हल्ल्याच्या १५ दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदुर अंतर्गत पाकिस्तानच्यादहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला. यात पाकच्या १०० किमी आत जाऊन भारतीय सैन्याने दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. 

LIVE

Get Latest Updates

12 May, 25 : 12:50 PM

३२ विमानतळांसाठी जारी केलेले NOTAMs रद्द करण्यात आले, आजपासून संचालन सुरु होणार

३२ विमानतळांसाठी जारी केलेले NOTAMs रद्द करण्यात आले

12 May, 25 : 12:36 PM

पंतप्रधानांच्या निवासस्थानी ऑपरेशन सिंदूरबाबत तासाभरापासून उच्चस्तरीय बैठक सुरू.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी ऑपरेशन सिंदूरबाबत तासाभरापासून उच्चस्तरीय बैठक सुरू.

12 May, 25 : 12:34 PM

भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंची हॉटलाइनवर चर्चा अद्याप झाली नाही

युद्धविरामानंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंची हॉटलाइनवर चर्चा होऊ शकली नाही

12 May, 25 : 12:16 AM

पंजाबमधील होशियारपूर येथे ब्लॅक आऊट, अचानक सायरनचा आवाज

पंजाबमधील होशियारपूर येथे अचानक सायरन ऐकू आल्याने आणि त्यानंतर संपूर्ण परिसरात अंधार पसरल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

12 May, 25 : 12:14 AM

दिल्ली विमानतळावरील सेवा सामान्यपणे कार्यरत; प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी

12 May, 25 : 12:07 AM

दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो- अरुण साव

पहलगाम घटनेनंतर भारत सरकारने ज्या पद्धतीने अनेक ऐतिहासिक आणि कडक निर्णय घेतले, मग ते सिंधू पाणी करार रद्द करणे असो, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे असो, सीमा बंद करणे असो. ऑपरेशन सिंदूर भारत आणि भारतीय सैन्यासाठी एक मोठा विजय होता. भारताने पाकिस्तानात १०० किमी आत जाऊन ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले, त्यांचे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केले आणि अहवालानुसार सुमारे १०० दहशतवादी मारले, तेव्हा ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण जगाला संदेश दिला की भारतात 'सिंदूर'चे महत्त्व काय आहे, 'सिंदूर'ची किंमत काय आहे आणि भारत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री अरूण साव म्हणाले.

11 May, 25 : 10:00 PM

पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी नौदल होतं तयार


 

11 May, 25 : 09:56 PM

"जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"


 

11 May, 25 : 09:38 PM

IC-814 प्लेन हाईजॅकचा मास्टरमाइंड

युसूफ अझहर हा IC-814 प्लेन हाईजॅकचा मास्टरमाइंड होता, जो जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. तसेच अब्दुल मलिक रऊफ IC-814 हायजॅकिंगसह पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभागी होता. हवाई हल्ल्याचा उद्देश दहशतवादी हल्ल्यांच्या कट रचणाऱ्यांना शिक्षा करणं आणि त्यांच्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणं हा होता, जो आम्ही यशस्वीरित्या साध्य केला - राजीव घई 

11 May, 25 : 09:10 PM

भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. यानंतर आम्ही पाकिस्तानच्या डीजीएमओला एक हॉटलाइन संदेश पाठवला, इशारा दिला की, जर पाकिस्तानने पुन्हा युद्धविरामचे उल्लंघन केले, तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल - राजीव घई 

11 May, 25 : 08:44 PM

४० पाकिस्तानी सैनिक ठार - राजीव घई

पाकिस्तानने लहान ड्रोन आणि यूएव्हीद्वारे भारताच्या लष्करी तळांना आणि हवाई पट्ट्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेने प्रत्येक हल्ला हाणून पाडला. सीमेपलीकडून होणाऱ्या पाकिस्तानी गोळीबाराला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईतील भारतीय सैन्याने केवळ नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याचे ३०-४० सैनिक आणि अधिकारी मारले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे पाच जवानही शहीद झाले -  राजीव घई 

11 May, 25 : 08:32 PM

आपले सर्व पायलट सुखरूप परतले आहेत, ऑपरेशन सिंदूरमध्ये ५ सैनिक शहीद झाले - राजीव घई


 

11 May, 25 : 08:14 PM

"जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"


 

11 May, 25 : 07:59 PM

"भारताचं कोणतेही नुकसान झालं नाही"

एके भारती म्हणाले की,पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही, कारण भारतीय हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे सक्रिय आणि सतर्क होती. आमच्या हवाई संरक्षण तयारीमुळे, पाकिस्तानी हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नाही. 
 

11 May, 25 : 07:53 PM

हल्ल्याचे ड्रोन आणि सॅटेलाइट फुटेज

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बहावलपूर येथील दहशतवादी तळावर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला आणि तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला. हा परिसर जैश-ए-मोहम्मदचं मुख्य ठिकाण मानलं जातं, जिथून भारताविरुद्ध बऱ्याच काळापासून दहशतवादी कारवाया केल्या जात होत्या.  एके भारती यांनी हल्ल्याचे ड्रोन आणि सॅटेलाइट फुटेज सादर केले, ज्यामध्ये बहावलपूरमध्ये झालेला प्रचंड विनाश स्पष्टपणे दिसत आहे.
 

11 May, 25 : 07:46 PM

"फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच लक्ष केंद्रित केले"

हवाई दलाचे महासंचालक एअर ऑपरेशन्स एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाने अतिशय काळजीपूर्वक फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच लक्ष केंद्रित केले आणि कोणत्याही नागरिकाची जीवितहानी होऊ दिली नाही. आम्ही संपूर्ण योजना अशा प्रकारे बनवली होती की फक्त दहशतवादी अड्ड्यांवरच अचूक हल्ला होईल आणि कोणत्याही नागरिकाचे नुकसान होणार नाही.

11 May, 25 : 07:36 PM

मुरीदके आणि बहावलपूर सारख्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला झाला - एके भारती

11 May, 25 : 07:33 PM

१०० हून अधिक दहशतवादी मारले

काही ठिकाणं पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये होती आणि काही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात होती - जे मुरीदके, कसाब आणि डेव्हिड हेडली सारख्या दहशतवाद्यांशी संबंधित आहेत. हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले, ज्यात युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदस्सीर अहमद सारखे टार्गेट होते. हे दहशतवादी  IC 814 हाइजॅक  आणि पुलवामा हल्ल्यात सहभागी होते - राजीव घई

11 May, 25 : 07:32 PM

पहलगाममध्ये भारतीय नागरिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरची योजना आखण्यात आली होती. या कारवाईचे लष्करी उद्दिष्ट  हे दहशतवादी आणि त्यांचे अड्डे नष्ट करणं होतं. आम्ही सीमेपलीकडील दहशतवादी तळांची सखोल ओळख पटवली. परंतु तेथील अनेक ठिकाणं आधीच रिकामी करण्यात आली होती, परंतु आम्हाला अशी ९  ठिकाणं आढळली जी आमच्या एजन्सींनी एक्टिव्ह असल्याचं सांगितलं -  राजीव घई 

11 May, 25 : 07:31 PM

तीन मोठे दहशतवादी मारले

भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी  'ऑपरेशन सिंदूर' बद्दल महत्त्वाची माहिती दिली. "ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट फक्त दहशतवाद्यांचा खात्मा करणं आहे. आपण १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला" असल्याचं घई यांनी म्हटलं आहे. तसेच दहशतवाद्यांचे अड्डे उडवून दिल्याचे पुरावे दाखवले. दहशतवादी हल्ल्याला लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये मुदस्सर खार, हाफिज जमील आणि युसूफ अझहर असे तीन मोठे दहशतवादी मारले गेले आहेत.

11 May, 25 : 07:30 PM

"दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"

11 May, 25 : 07:03 PM

काश्मीर प्रश्नी अमेरिकेचा मध्यस्थीचा प्रस्ताव भारताने फेटाळला

पाकिस्तान आणि भारतामध्ये असलेल्या काश्मीर प्रश्नी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला. अमेरिकेच्या या प्रस्तावाचे पाकिस्तानने स्वागत केले. पण, भारताने मध्यस्थीचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, भारताची यासंदर्भात भूमिका स्पष्ट आहे. काश्मीर प्रश्नी आमची भूमिका स्पष्ट आहे आणि कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी मान्य नाही. पाकिस्तानला दहशतवादी भारताच्या ताब्यात द्यायचे असतील, चर्चेचे दरवाजे खुले आहेत. 

आता फक्त पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली जाऊ शकते. त्याशिवाय इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याची गरज नाही, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

11 May, 25 : 05:37 PM

'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'

पाकिस्तानच्या आयएसआयशी सलग्नित असलेल्या मुरिदके, बहावलपूर या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले करून भारताने स्पष्ट मेसेज दिला आहे की, आमचे लक्ष्य भटकलेले नाही. आम्ही आता लहान अड्ड्यांवर हल्ला करणार नाही, तर आता तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू, असे पंतप्रधान मोदी बैठकीत म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

11 May, 25 : 04:35 PM

भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केले हे मोठे घाव

भारतीय लष्कराच्या दहशतवादी तळावरील हल्ल्यांनंतर पाकिस्तानी लष्कराने हवाई हल्ले केले. त्याला भारतानेही तसेच उत्तर दिले. भारतीय लष्कराने पाकिस्तानातील ११ हवाई तळांनाच लक्ष्य केले. यात हवाई तळांचं प्रचंड नुकसान झाले. 

दुसरं म्हणजे भारताने पाकिस्तानची AWACS एअर डिफेन्स सिस्टिमही उद्ध्वस्त केली. भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले, ज्यात १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेले दहशतवाद्यांचे अनेक लॉन्चिंग पॅड्सही भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले.

11 May, 25 : 03:55 PM

ब्रह्मोस मिसाईलची ताकद पाकिस्तानला विचारा -योगी आदित्यनाथ

ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस मिसाईलची एक झलक बघायला मिळाली. जर बघितली नसेल, तर पाकिस्तानातील लोकांना जाऊन विचारा की, ब्रह्मोस मिसाईलची ताकद काय आहे, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. 

उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये ब्रह्मोस सुपरनसॉनिक क्रूज मिसाईल उत्पादन युनिटचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते. 

11 May, 25 : 03:36 PM

ब्रह्मोस सुपरसॉनिक मिसाईल निर्मिती कारखान्याचे उद्घाटन

पाकिस्तानच्या सीमेपलिकडून सुरू असलेल्या कुरघोड्यांमुळे लष्करी संघर्ष वाढला आहे. पाकिस्तानी लष्कराकडून हवाई हल्ले केले जात असून, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हवाई तळांना लक्ष्य केले. अशातच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमधील ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल निर्मिती कारखान्याचे उद्घाटन केले. 

11 May, 25 : 02:35 PM

जैसलमेरमध्ये आढळलेली मिसाईल निष्क्रिय

राजस्थानातील जैसलमेरमध्ये पाकिस्तानी मिसाईल कोसळली होती. ती भारतीय लष्कराकडून निष्क्रिय करण्यात आली.

 

11 May, 25 : 02:03 PM

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरवर मोठे विधान

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, रावळपिंडीपर्यंत भारतीय सैन्याची उपस्थिती दिसून येत होती. लष्कराने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार मारले. ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही दाखवून दिले की भारत दहशतवादाविरुद्ध कारवाई करत आहे. भारतीय लष्कराने फक्त पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना लक्ष्य केले, परंतु पाकिस्तानी लष्कराने सामान्य नागरिकांना लक्ष्य केले. याशिवाय पाकिस्तानी सैन्याने मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि चर्चला लक्ष्य केले.

11 May, 25 : 01:19 PM

ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे..., हवाई दलाने म्हटले- 'आमचे लक्ष्य साध्य झाले'

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर भारतीय हवाई दलाकडून एक मोठे विधान समोर आले आहे. हवाई दलाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरू आहे. हवाई दलाने सांगितले की, "ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आम्हाला दिलेले लक्ष्य साध्य झाले आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. लवकरच याबद्दल माहिती दिली जाईल."

11 May, 25 : 12:20 PM

अमृतसरमध्ये परिस्थिती सामान्य

अमृतसरमधील परिस्थिती सामान्य असल्याचे अमृतसर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. लोक त्यांचे दैनंदिन काम करत आहेत. रविवारी कार्यालये उघडत नाहीत, परंतु बाजारपेठा उघड्या राहतात आणि जीवन सामान्य राहते. त्यांनी लोकांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.

11 May, 25 : 12:18 PM

युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली

युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सीडीएस देखील उपस्थित होते.

11 May, 25 : 06:07 AM

कृपया रस्त्यावर, बाल्कनीत किंवा टेरेसवर फिरू नका, अमृतसरमध्ये मार्गदर्शक सूचना

11 May, 25 : 06:05 AM

अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम

11 May, 25 : 04:24 AM

दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी

11 May, 25 : 01:32 AM

जम्मूमधील नागरोटा आर्मी स्टेशनवर गोळीबारात एक जवान जखमी

11 May, 25 : 01:13 AM

लातूर रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल! प्रशासनाच्या सतर्कतेचे घेतले प्रात्यक्षिक

भारत व पाकिस्तानदरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी दुपारी रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल घेण्यात आले. प्रशासनाच्या सतर्कतेच्या प्रात्यक्षिकाबरोबर नागरिकांना कोणत्याही दहशतवादी हल्ल्यावेळी प्रसंगावधान राखून घ्यावयाच्या काळजीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, या रंगीत तालमीच्या थराराचा नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवही घेतला. नागरिकांनी जागरूक राहून शहराच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काहीही माहिती असल्यास नियंत्रण कक्ष, लातूर फोन क्र. ०२३८२-२४२२९६, डायल ११२ वर संपर्क करून कळवावे, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात येत आहे. 

11 May, 25 : 12:07 AM

नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी

नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी 

10 May, 25 : 11:46 PM

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा

10 May, 25 : 10:38 PM

पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले

पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले

10 May, 25 : 08:00 PM

शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक

शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक 

10 May, 25 : 07:44 PM

भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर आयपीएल पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा, बीसीसीआय करणार घोषणा

भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर आयपीएल पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा, बीसीसीआय करणार नव्या वेळापत्रकाची घोषणा 

10 May, 25 : 07:13 PM

ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती -शरद पवार

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर शरद पवार यांनी एक पोस्ट करत भूमिका मांडली आहे. 

शरद पवार यांनी भारत-पाकिस्तान संघर्षावर केलेली पोस्ट

भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली — कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती.

पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरघोड्यांना संयमाने आणि निर्णायक उत्तर देणं ही भारताची जबाबदारी आहे आणि भारताने ती जागतिक शांततेच्या भानासह पार पाडली आहे.

भारत हा नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक राहिला आहे. आणि त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर ते स्वागतार्ह आहे. मात्र दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलणं हेदेखील आंतरराष्ट्रीय समुदायाचं सामूहिक कर्तव्य आहे. शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल — हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं.

10 May, 25 : 06:47 PM

युद्धविराम कधीपासून? भारत-पाकिस्तान यांच्यात काय झाली चर्चा?

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी याबद्दल अधिक माहिती दिली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "पाकिस्तानचे लष्करी मोहीम महासंचालक (डीजीएमओ) आणि भारताचे लष्करी मोहीम संचालक (डीजीएमओ) यांच्यात आज (१० मे) दुपारी ३.३५ मिनिटांनी चर्चा झाली."

"दोन्ही देशांकडून जमिनीवरून, हवेतून आणि समुद्रातून होणार हल्ले भारतीय प्रमाणवेळेनुसार ५ वाजेपासून (१० मे रोजीपासून) तात्काळ थांबवण्यावर एकमत झाले. याची अमलबजावणी करण्याचे दोन्ही बाजूंना सांगण्यात आले आहे. दोन्ही देशांचे डीजीएमओ यांच्या १२ मे रोजी पुन्हा दुपारी १२ वाजता चर्चा होणार आहे", असे मिस्त्री यांनी सांगितले.

10 May, 25 : 06:21 PM

भारत पाकिस्तान लष्करी संघर्षाला पूर्णविराम! डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा

मागील तीन-चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. दोन्ही देशातील लष्करी थांबावा आणि तणाव निवळावा यासाठी प्रयत्न सुरू होते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेनंतर अखेर मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तान हे दोघेही पूर्णपणे आणि तात्काळ शस्त्रसंधी करण्यास तयार झाले आहेत. सारासार विचार आणि विद्वत्तेचा वापर केल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन.   

10 May, 25 : 04:54 PM

...तर ते देशाविरोधात युद्ध समजलं जाईल -केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. दोन्ही देशातील लष्करी संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. भविष्यात कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला, तर तो देशाविरोधात युद्ध समजले जाईल आणि त्यानुषंगाने पुढील कारवाई केली जाईल, असा निर्णय भारताने घेतला आहे. 

10 May, 25 : 04:14 PM

India Pakistan News: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी

मागील तीन-चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्कर संघर्ष वाढला आहे. ८ मेपासून पाकिस्तानकडून रात्रीच्या वेळी हवाई हल्ले केले जात आहे. त्याचबरोबर सीमेपलिकडून अंदाधूंद गोळीबारही सुरू आहे. भारताकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, लष्कराने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या या लष्करी संघर्षात बीएसएफचे आठ जवान जखमी झाले आहेत. जम्मूमधील आरएस पुरा पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले. 

10 May, 25 : 01:52 PM

जम्मूमध्येही मिळाले क्षेपणास्त्राचे काही भाग आणि तुकडे

10 May, 25 : 01:06 PM

पाकिस्तान हा दहशतवादी देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले

"पाकिस्तान हा एक दहशतवादी देश, त्याने नेहमीच दहशतवादाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भारत आता थांबणार नाही. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आमचे सैन्य योग्य प्रत्युत्तर देत आहे. आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे. कालच आम्ही एक बैठक घेतली, ज्यामध्ये आपण कोणती खबरदारी घ्यावी हे ठरवले. आम्ही आवश्यक उपाययोजना करत आहोत. सर्व जिल्हा युनिट्सना आवश्यक माहिती आणि संसाधने पुरवण्यात आली आहेत अशी माहिती भारत-पाकिस्तान तणावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

10 May, 25 : 12:21 PM

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकच्या उपपंतप्रधानांसोबत केली चर्चा

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्याशी चर्चा केली. दोन्ही पक्षांनी सध्याची परिस्थिती कमी करण्याचे मार्ग काढला पाहिजे. गैरसमज टाळून पुन्हा चर्चा केली पाहिजे असा पुनरुच्चार रुबियो यांनी केला. भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी अमेरिकेने मदत करण्याची ऑफरही दिली.

10 May, 25 : 12:19 PM

राजस्थानात पोलिसांनी क्षेपणास्त्राचे अवशेष जप्त केले

राजस्थानच्या बारमेरमधील पोलिसांनी क्षेपणास्त्राचे अवशेष जप्त केले. जे नंतर पोलिसांच्या वाहनातून नेले जातात. जैसलमेर आणि पोखरणमधूनही असेच तुकडे आणि अवशेष सापडले आहेत.

10 May, 25 : 12:15 PM

फतेह २ मिसाईलचा दावा खोटा, दिल्ली एअरपोर्ट प्राधिकरणाचं स्पष्टीकरण

पाकिस्ताननं दिल्ली एअरपोर्टवर फतेह २ मिसाईलनं हल्ला केल्याची माहिती सोशल मीडियात पसरवली जात आहे परंतु हे साफ खोटे आहे. अशा बनावट आणि चुकीच्या दाव्यापासून लोकांनी सतर्क राहावे, प्रवाशांनी आणि जनतेने योग्य माहितीसाठी अधिकृत संस्थांवर अवलंबून राहावे असं दिल्ली एअरपोर्टचे प्रवक्ते म्हणाले आहेत. 

10 May, 25 : 11:54 AM

जैसलमेर, पोखरण भागात पाकच्या मिसाईलचे तुकडे

शुक्रवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर राजस्थानमधील बारमेर येथे एका मोठ्या क्षेपणास्त्राचे तुकडे आढळले आहेत. जैसलमेर आणि पोखरण येथूनही असेच तुकडे सापडले आहेत.

10 May, 25 : 11:09 AM

भारतीय सैन्याने फाडला पाकिस्तान फेक नरेटिव्हचा बुरखा

पाकिस्तानी प्रचाराच्या दाव्यांचे खंडन करत भारताने भारतीय हवाई तळांचे नुकसान न झालेले फोटो दाखवले

10 May, 25 : 11:03 AM

पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारतीय सैन्याचं चोख उत्तर

पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने पश्चिमी सीमेवर ड्रोनने हल्ले सुरू आहेत. २६ हून अधिक ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला त्याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने रात्री १ च्या सुमारास पंजाबच्या एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांवर जाणूनबुजून हल्ले करण्यात येत आहेत. पाकिस्तानने लाहोर येथून नागरी विमानांना उड्डाणाची परवानगी देत नागरिकांना ढाल बनवण्याचा प्रयत्न केला. भारत पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर देत आहे. वैद्यकीय सेवा, शाळांनाही पाकिस्तानी सैन्य लक्ष्य करत आहेत. भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर देत पाक सैन्याला मोठे नुकसान पोहचवले आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारतीय सैन्य जशास तसे उत्तर दिले आहे अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी माध्यमांना दिली. 

10 May, 25 : 10:52 AM

जैसलमेर इथं पाकिस्तानी मिसाईलचे सापडले तुकडे

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मिळाले पाकिस्तानी मिसाईलचे तुकडे; सुरक्षा जवान घटनास्थळी 

10 May, 25 : 10:49 AM

पठाणकोट इथं पाकिस्तानी ड्रोन भारतीय एअर डिफेन्सनं पाडला

भारताने पठाणकोटवर हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचा एक ड्रोन पाडला, व्हिडिओमध्ये ड्रोन निष्क्रिय करण्याचा आवाज ऐकायला येतो

10 May, 25 : 10:47 AM

मुख्यमंत्री मृत अधिकारी थापा यांच्या कुटुंबियांच्या भेटीला

पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबारात जम्मू काश्मीर प्रशासनातील अधिकारी राजकुमार थापा यांचे निधन झाले. आज मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी थापा कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. 

10 May, 25 : 10:14 AM

BSF नं सियालकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले

अखनूर क्षेत्रासमोरील पाकिस्तानातील सियालकोट जिल्ह्यातील लूनी येथील दहशतवादी लाँन्च पॅड बीएसएफने पूर्णपणे उद्ध्वस्त केले.

10 May, 25 : 10:13 AM

गुजरातच्या कच्छमधून प्रक्षेपणाचा ढिगारा सापडला

10 May, 25 : 09:03 AM

अमृतसर छावणीवर पाकच्या ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी

पहाटे ५ च्या सुमारास पाकिस्तानकडून अमृतसर छावणीवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र हे ड्रोन हवेतच उडवण्यात आले अशी माहिती भारतीय लष्कराने देत पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर देऊ असा इशाराही दिला आहे. 

10 May, 25 : 05:46 AM

पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले, सर्व प्रकरच्या उड्डाणे बंद केली.

पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले, सर्व प्रकरच्या उड्डाणे बंद केली.

10 May, 25 : 05:45 AM

जम्मू आणि काश्मीर | राजौरीमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. स्फोटांचे आवाज ऐकू आले.

जम्मू आणि काश्मीर | राजौरीमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. सतत स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.

10 May, 25 : 05:44 AM

भारताने ६ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, पाकिस्तानी लष्कराचा दावा

भारताने ६ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, पाकिस्तानी लष्कराचा दावा

10 May, 25 : 05:35 AM

थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद. पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार.

थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद. पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार.

10 May, 25 : 04:29 AM

पाकिस्तानच्या नूर खान बेसवर हल्ला; Video समोर आला...

10 May, 25 : 12:35 AM

भारतीय सैन्य जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तर

संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील (आयबी) भारतीय शहरांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तर देत आहे.

09 May, 25 : 02:53 PM

केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय, राज्यांना दिला अधिकार

गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना पत्र लिहून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी नागरी संरक्षण नियमांतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्यास सांगितले आहे. 

09 May, 25 : 02:37 PM

पुंछच्या नागरी वस्तीत पाकिस्तानने डागले मिसाईल

गुरुवारी रात्री झालेल्या पुंछ येथील हल्ल्यात पाकिस्तानने नागरी वस्तीवर मिसाईल डागल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.  

09 May, 25 : 02:35 PM

जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी घेतला सुरक्षेचा आढावा

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी उरी परिसरात सुरक्षा जवानांची घेतली भेट, उरीत पाकिस्तानकडून गुरुवारी रात्री झाला होता हल्ल्याचा प्रयत्न 

09 May, 25 : 01:33 PM

जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी घेतला सुरक्षेचा आढावा

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी उरी परिसरात सुरक्षा जवानांची घेतली भेट, उरीत पाकिस्तानकडून गुरुवारी रात्री झाला होता हल्ल्याचा प्रयत्न 

09 May, 25 : 01:08 PM

RSS नं पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या कारवाईवर दिली प्रतिक्रिया

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल सरकारी नेतृत्व आणि भारतीय सैन्याचे कौतुक, पाकिस्तानी सैन्याद्वारे धार्मिक स्थळावर होणाऱ्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. आपल्या सर्वांना नागरिक म्हणून कर्तव्य सांभाळत सतर्क राहायला हवे. देशविरोधी शक्तींचं कुठलेही षडयंत्र यशस्वी होता कामा नये. देशभक्ती म्हणून नागरिकांनी प्रशासनाला जिथे गरज असेल तिथे सहकार्य करण्यास तत्पर राहायला हवे - मोहन भागवत, सरसंघचालक, RSS

09 May, 25 : 12:52 PM

देशातील वैद्यकीय सुविधेचा केंद्रीय मंत्री घेणार आढावा

भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी नड्डा यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची बोलावली बैठक, देशातील वैद्यकीय सेवेचा घेणार आढावा 

09 May, 25 : 12:13 PM

IPL सामने स्थगित होणार?, BCCI घेणार निर्णय

भारत-पाकिस्तान वाढत्या तणावाचा आयपीएलवर परिणाम, IPL चे सामने स्थगित होण्याची शक्यता, बीसीसीआय बैठकीत होणार निर्णय 

09 May, 25 : 11:56 AM

सीमाभागातील लोक घेतायेत सुरक्षितस्थळी आश्रय

आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून पाकिस्तान सातत्याने गोळीबार करत आहे. त्यात खबरदारी म्हणून सीमा भागातील लोक सुरक्षित स्थळी आसरा घेण्यासाठी जात आहेत. 

09 May, 25 : 11:25 AM

भारतात घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफच्या जवानांनी उधळला

बीएसएफने जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न उधळून लावला, किमान सात दहशतवाद्यांना ठार मारले आणि पाकिस्तानी चौकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले, असे बीएसएफने म्हटले आहे.

09 May, 25 : 11:22 AM

सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर CM फडणवीसांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बोलावली उच्चस्तरीय बैठक, पोलीस, प्रशासकीय अधिकारी राहणार उपस्थित 

09 May, 25 : 10:38 AM

भारतीय सैन्यामागे संपूर्ण देश, संजय राऊतांनी दिला पाठिंबा

युद्ध परिस्थितीत आमचा सरकारला आणि भारतीय सैन्याला पाठिंबा आहे - संजय राऊत, उद्धवसेना खासदार 

09 May, 25 : 10:06 AM

पाकिस्तानची भागीदारांकडे मागितले अधिकचे कर्ज

शत्रूकडून झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय भागीदारांना अधिक कर्जासाठी आवाहन केले आहे. वाढत्या युद्ध आणि साठ्यातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर, आम्ही आंतरराष्ट्रीय भागीदारांना तणाव कमी करण्यास मदत करण्याचे आवाहन करतो असं पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयानं अधिकृत ट्विट केले आहे. 

09 May, 25 : 09:01 AM

बगलिहार धरणाचे दरवाजे भारताने उघडले

भारताने उघडले बगलिहार धरणाचे दरवाजे, चिनाब नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने पाकिस्तानला पूराचा धोका

09 May, 25 : 08:58 AM

जम्मू काश्मीरातील नागरी वस्तीवर पाकिस्तानचे हल्ले

गुरुवारी रात्री ९ वाजल्यापासून पाकिस्तानने भारतातील सीमेजवळील गावांमध्ये ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न केले, त्यात काही ठिकाणी नागरी वस्तीत मोठे नुकसान झाले आहे 

09 May, 25 : 05:24 AM

जम्मू-काश्मीर: उरी सेक्टरमध्ये सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू, काही जण जखमी

जम्मू-काश्मीर: उरी सेक्टरमध्ये सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू, काही जण जखमी

09 May, 25 : 04:23 AM

जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ स्फोटांचे आवाज; जम्मूमध्ये ब्लॅकआऊट

जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ स्फोटांचे आवाज; जम्मूमध्ये ब्लॅकआऊट

09 May, 25 : 01:55 AM

भारत आणि पाकिस्तानने अरबी समुद्रात नौदल फायरिंग सरावासाठी अधिसूचना जारी केली

भारत आणि पाकिस्तानने अरबी समुद्रात नौदल फायरिंग सरावासाठी अधिसूचना जारी केली

09 May, 25 : 01:17 AM

चांदीपूर क्षेपणास्त्र रेंजची सुरक्षा वाढवली, डीआरडीओने बोलावली आपत्कालीन बैठक

चांदीपूर क्षेपणास्त्र रेंजची सुरक्षा वाढवली, डीआरडीओने बोलावली आपत्कालीन बैठक

09 May, 25 : 01:16 AM

पाकिस्तान: क्वेट्टामधील ४ ठिकाणी हल्ला, पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केले

पाकिस्तान: बलुच लढवय्यांचा क्वेट्टामधील ४ ठिकाणी हल्ला, पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केले

09 May, 25 : 01:14 AM

पठाणकोटमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानी लढाऊ विमान पाडले

पठाणकोटमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानी लढाऊ विमान पाडले

09 May, 25 : 01:08 AM

पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले

पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी सुनावले

09 May, 25 : 12:16 AM

पाकिस्तानने उरी परिसरात नागरी वस्तीला केलं लक्ष्य

पाकिस्तानने उरी परिसरात नागरी वस्तीला केलं लक्ष्य, हॉटेलबाहेर तोफगोळा पडून लागली आग 

09 May, 25 : 12:15 AM

आम्ही हल्ला केलाच नाही, भारताच्या तगड्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानची पलटी

आज संध्याकाळी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारतीय सैन्य दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर आता पाकिस्तानने पलटी मारली असून, आपण हा हल्ला केलाच नसल्याचा दावा केला आहे. 

08 May, 25 : 11:53 PM

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट

पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना भारताने जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट झाल्याचा दावाही केला जात आहे.

08 May, 25 : 11:33 PM

भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल स्थगित होण्याची शक्यता

पाकिस्तानने भारताच्या हद्दीत क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर आज धर्मशाला येथे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेला सामना रद्द करण्यात आला असून, तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्थगित होण्याची शक्यता आहे. 

08 May, 25 : 10:37 PM

पाकिस्तानचा एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त, भारताचा लाहोरवर मोठा हल्ला

 पाकिस्तानचा एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त, भारताचा लाहोरवर मोठा हल्ला 

08 May, 25 : 08:49 PM

जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार

जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, हल्ल्याचे सायरन वाजले, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार

08 May, 25 : 07:07 PM

पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील...

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, पहलगाम हल्ल्ल्याचे प्रत्युत्तर पाकिस्तानला देण्यात आले. आता यापुढे पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला, तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील. पाकिस्तानने यापुढे कोणतीही कारवाई केली, तर त्याला भारताकडून तशाच प्रकारचा प्रतिसाद दिला जाईल.

08 May, 25 : 06:24 PM

पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र: परराष्ट्र सचिव

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र असतानाही त्याची जबाबदारी नाकारत आहे. जगातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचे दहशतवादासोबतचे संबंध मान्य केले आहेत. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची पाकिस्तानची मागणी देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. पठाणकोट आणि मुंबई हल्ल्यांबाबत भारताने सर्व पुरावे दिले, पण पाकिस्तानने कोणतीही कारवाई केली नाही.

08 May, 25 : 06:24 PM

पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना संरक्षण देतो: विक्रम मिस्री

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सीमेपलीकडून आपल्याविरुद्ध बरीच चुकीची माहिती दिली जात आहे. वाढत्या तणावाबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, पहलगाममधील हल्ला हा तणाव वाढण्याचे पहिले कारण आहे, ज्याला भारतीय लष्कराने काल प्रत्युत्तर दिले आहे. 'द रेझिस्टन्स फ्रंट' गट हा लष्कर-ए-तैयबाचा भाग आहे. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीबद्दलची सर्व माहिती आम्ही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (UNSC) देत आहोत. टीआरएफबद्दल अपडेट्स सतत दिले जात आहेत. जेव्हा UNSC च्या निवेदनात TRF चे नाव समाविष्ट करण्याची वेळ आली, तेव्हा फक्त पाकिस्ताननेच त्याला विरोध केला आणि ते नाव काढून टाकले. हे स्पष्ट संकेत आहे की, पाकिस्तान अजूनही या दहशतवादी गटांना संरक्षण आणि पाठिंबा देत आहे.

08 May, 25 : 05:41 PM

भारताचा लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला

काल भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारताने आपल्या सीमेवरून क्षेपणास्त्रे डागली होती, आता आज पाकिस्तान लष्कराने पत्रकार परिषद घेऊन नवीन दावा केला आहे की, 'भारताने बुधवारी रात्रीही अनेक ठिकाणांना लक्ष्य केले. भारताने इस्रायली हारोप ड्रोनचा वापर करून हा हल्ला केला. हे हल्ले लाहोर, कराची, गुजरांवाला, चकवाल, रावळपिंडी, बहावलपूर, मियांवाली आणि चोर या शहरांमध्ये केल्याचा दावा केला.

08 May, 25 : 03:45 PM

पाकिस्तानची HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली केली उद्ध्वस्त

भारताने सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्येपाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारतानेपाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला करून ती यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. यासंदर्भातील माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. भारताच्या हल्ल्यांमध्ये क्षेपणास्त्र लाँचर्सचेही मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानला चीनकडून HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली मिळाली आहे.

08 May, 25 : 02:37 PM

'ऑपरेशन सिंदूर' सुरूच

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे. ६-७ मे रोजी झालेल्या या कारवाईअंतर्गत, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले, ज्यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले.

08 May, 25 : 12:28 PM

'ऑपरेशन सिंदूर'वर सर्वपक्षीय बैठक सुरू, अमित शहा, मल्लिकार्जुन खरगे-राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती

'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ही बैठक संसद भवनात सुरू झाली आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. या बैठकीत सर्व पक्षांना पाकिस्तानविरुद्ध भारताच्या लष्करी कारवाईची माहिती दिली जाईल. याशिवाय, सीमा सुरक्षेशी संबंधित बाबींवरही चर्चा होईल. 

08 May, 25 : 11:17 AM

पाकिस्तानातील मुरीदके येथून एक नवीन व्हिडिओ समोर आला

पाकिस्तानातील मुरीदके येथून एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. नवीन व्हिडीओ लष्करच्या मुख्यालय मरकज तैयबा येथील असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे ८२ एकर जागेत पसरलेल्या या संकुलाच्या व्हिडिओमध्ये बचाव वाहने आणि रुग्णवाहिका उभ्या असलेल्या दिसत आहेत. हाफिज सईदच्या दहशतवादी छावणीतील उद्ध्वस्त इमारतींचे विखुरलेले अवशेष भारतीय हल्ल्यामुळे झालेल्या विध्वंस झाल्याचे दिसत आहे.

08 May, 25 : 10:30 AM

उत्तराखंड पोलिसांनी नेपाळ सीमेवर सुरक्षा वाढवली

उत्तराखंड पोलिसांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे आणि नेपाळ सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस प्रमुख दीपम सेठ म्हणाले की, भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे सर्व पोलीस पथके हाय अलर्टवर आहेत.

08 May, 25 : 09:58 AM

गुलमर्गमध्ये पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी 

'ऑपरेशन सिंदूर'नंतर नियंत्रण रेषेवर सतत होत असलेल्या गोळीबाराची दखल घेऊन, गुलमर्गमध्ये पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी परिसरात उपस्थित असलेल्या सर्व पर्यटकांना बाहेर काढण्यात आले.

08 May, 25 : 08:28 AM

सीमावर्ती भागात असलेले सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय

पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने सर्व सीमावर्ती भागात हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या आहेत. संरक्षण अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

08 May, 25 : 07:32 AM

पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

७-८ मे च्या रात्री, पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर भागातील नियंत्रण रेषेवरील छोट्या शस्त्रे आणि तोफखान्यांचा वापर करून अकारण गोळीबार केला. भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले. 

 

08 May, 25 : 05:34 AM

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे पाकिस्तानकडून दुसऱ्या रात्री गोळीबार, भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे पाकिस्तानकडून दुसऱ्या रात्री गोळीबार, भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.

08 May, 25 : 02:37 AM

पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन

पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन

07 May, 25 : 10:15 PM

''जे आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही कठोर प्रत्युत्तर देऊ, ऑपरेशन सिंदूर हा त्याचा पुरावा''

''जे आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही कठोर प्रत्युत्तर देऊ, ऑपरेशन सिंदूर हा त्याचा पुरावा'', अनुपम खेर यांची प्रतिक्रिया

07 May, 25 : 09:37 PM

भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष

भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष

07 May, 25 : 08:56 PM

नियंत्रण रेषेजवळील भागात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पुंछ येथे एका गुरुद्वाराचं नुकसान

नियंत्रण रेषेजवळील भागात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पुंछ येथे एका गुरुद्वाराचं नुकसान, १२ जणांचा मृत्यू, १२ जणांपैकी पाच जण शीख समुदायातील, नरींदर सिंग यांनी दिली माहिती 

07 May, 25 : 08:30 PM

आम्ही संयम पाळणार, तणाव वाढता कामा नये, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले

आम्ही संयम पाळणार, तणाव वाढता कामा नये, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले 

07 May, 25 : 08:08 PM

देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट

युद्धसज्जतेचा सराव म्हणून आज देशातील विविध भागात मॉकड्रिक घेण्यात आली, यावेळी अनेक ठिकाणी ब्लॅक आऊट करण्यात आला होता

07 May, 25 : 07:00 PM

पहलगाम दहशतवादी हल्ल्याची माहिती शेअर करण्याचं NIA ने लोकांना केलं आवाहन

07 May, 25 : 06:49 PM

"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद"

भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये २६ मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतला. आता पाकिस्तानचे भारतातील स्लिपर्स सेल उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समुळ उच्चाटन करणे गरजेचे आहे - उद्धव ठाकरे 

07 May, 25 : 06:28 PM

सैन्याला पूर्ण पाठिंबा आणि शुभेच्छा - राहुल गांधी

आम्ही कार्यकारिणीत यावर चर्चा केली. आमचा सैन्याला पूर्ण पाठिंबा, त्यांना शुभेच्छा. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस कार्यकारिणीचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्हाला उद्या सर्वपक्षीय बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे - राहुल गांधी 

07 May, 25 : 06:14 PM

" भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान"

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर धाडसी आणि निर्णायक कारवाई करून योग्य उत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या शूर सैनिकांच्या धाडसाला, दृढनिश्चयाला आणि देशभक्तीला आम्ही सलाम करतो. दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या दिवसापासूनच काँग्रेसने लष्कर आणि सरकारसोबत एकता दाखवली आणि सीमापार दहशतवादाविरुद्धच्या प्रत्येक निर्णायक कारवाईला पाठिंबा दिला - मल्लिकार्जुन खरगे 

07 May, 25 : 05:57 PM

तणाव वाढवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. परंतु, जर पाकिस्तानने तसे करण्याचा निर्णय घेतला तर, भारत जोरदार प्रत्युत्तर देण्यास तयार आहे असं भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल आणि 'नॉन-एस्कलेटेबल' उपाययोजनांबद्दल विविध देशांमधील त्यांच्या समकक्षांना माहिती देताना डोवाल यांनी हे विधान केले. 

07 May, 25 : 05:53 PM

अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया आणि जपानमधील त्यांच्या समकक्षांशी चर्चा केली. त्यांनी रशिया आणि फ्रान्समधील अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे. अजित डोवाल यांनी विविध देशांतील त्यांच्या समकक्षांना पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईची आणि संघर्ष रोखण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली.

07 May, 25 : 05:43 PM

"ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"

पाकिस्तानी दहशतवादी अड्ड्यांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर विनय नरवालची पत्नी हिमांशी नरवाल हिने प्रतिक्रिया दिली आहे. आज आपल्या सैन्याने आणि मोदी सरकारने दहशतवाद्यांना रोखठोक उत्तर दिलं आहे आणि हे सिद्ध केलं आहे की, आता पाकिस्तानलाही २६ भारतीय कुटुंबांना झालेल्या वेदनांची जाणीव झाली असेल. आज केलेल्या ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे असं  हिमांशी नरवालने म्हटलं आहे. 

07 May, 25 : 05:26 PM

हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका

सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराने पाकला आणखी एक धक्का दिला आहे. पाकिस्तानच्या दाव्यानुसार, सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे जलसाठे नष्ट केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमधील 9 ठिकाणी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराने नीलम नदीच्या नीलम-झेलम धरणावर बॉम्ब टाकले. बॉम्बस्फोटामुळे धरणाचे मोठे नुकसान झाले आहे.

07 May, 25 : 05:02 PM

ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह

ऑपरेशन सिंदूर हे मोदींच्या नेतृत्वात. लष्कर आणि मोदींचे आभार मानतो. जे लक्ष्य होतं ते साध्य केलं. ज्यांनी आपल्या नागरिकांना मारलं, त्यांनाच मारलं असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 
 

07 May, 25 : 04:49 PM

'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर!

07 May, 25 : 04:41 PM

शरद पवारांनी केला नरेंद्र मोदींना फोन

07 May, 25 : 04:29 PM

सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा

ऑपरेशन सिंदूरच्या ब्रीफिंगमध्ये दोन चेहऱ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, जे भारताच्या महिला शक्तीचे प्रतीक बनले. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांचं सोशल मीडियावर लोक भरभरून कौतुक करत आहेत. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोन्ही महिला अधिकारींनी भारतीय सैन्याची ताकद आणि शौर्य जगासमोर मांडलं. यासोबतच त्यांनी भारतीय सैन्य पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादाचा कसा खात्मा करत आहे हे देखील सांगितलं.

07 May, 25 : 04:16 PM

राज्यात ठिकठिकाणी मॉक ड्रिल

07 May, 25 : 04:01 PM

या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी यांनी बोलावलेल्या बैठकीत जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री उपस्थित होते. याशिवाय, लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांसह सर्व राज्यांचे डीजीपी आणि मुख्य सचिव या बैठकीत हजर होते.

07 May, 25 : 03:49 PM

ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक

भारतीय लष्कराने काल मध्यरात्री पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागली. या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले, ज्यात सूमारे 100 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी सीमावर्ती नऊ राज्यांचे मुख्यमंत्री, डीजीपी आणि मुख्य सचिवांसोबत बैठक घेतली. बैठकीदरम्यान, शाहांनी युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेतला. 

07 May, 25 : 03:49 PM

ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक

भारतीय लष्कराने काल मध्यरात्री पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागली. या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले, ज्यात सूमारे 100 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी सीमावर्ती नऊ राज्यांचे मुख्यमंत्री, डीजीपी आणि मुख्य सचिवांसोबत बैठक घेतली. बैठकीदरम्यान, शाहांनी युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेतला. 

07 May, 25 : 03:12 PM

जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १० मे पर्यंत ९ विमानतळ बंद राहतील. त्यात जम्मू, जोधपूर, अमृतसर, चंदीगड, राजकोट, भूज, श्रीनगर, लेह आणि जामनगर एअरपोर्टचा समावेश आहे. 

07 May, 25 : 02:26 PM

पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट

केंद्रीय कॅबिनेट बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जात द्रौपर्दी मुर्मू यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. 

07 May, 25 : 02:24 PM

भारतीय लष्करानं शेअर केला ३० सेंकदचा व्हिडिओ

07 May, 25 : 02:23 PM

९ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री शाहांची बैठक

ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमावर्ती ९ राज्याच्या मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, राज्य सचिवांची बोलावली बैठक

07 May, 25 : 01:19 PM

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात

07 May, 25 : 12:56 PM

आज प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला असेल - मिलिंद देवरा

आज भारतीय जनतेच्या वतीने, पाकिस्तानला योग्य उत्तर दिल्याबद्दल मी पंतप्रधान, शूर जवान आणि सशस्त्र दलांचे आभार मानतो. पहलगाममध्ये ज्यांनी पती, मुले आणि वडील गमावले आहेत अशा सर्व विधवा, माता आणि मुलींच्या वतीने भारतीय सैन्याने या ऑपरेशनला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव दिले आहे. या ऑपरेशनमुळे प्रत्येक भारतीयाला, विशेषतः महिलांना भारताचा अभिमान वाटला आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित राहील असा विश्वास वाटतो - खासदार मिलिंद देवरा, शिवसेना

07 May, 25 : 12:11 PM

पहलगाम येथे पर्यटकांचा जल्लोष, भारतीय सैन्याच्या शौर्याचं कौतुक

07 May, 25 : 11:33 AM

पाकिस्तानातील दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केल्याचे व्हिडिओ

कर्नल सोफिया कुरेशी यांनी माध्यमांना संबोधित करताना पाकिस्तानच्या ६ किमी अंतरावर असलेल्या सियालकोट इथल्या सरजल कॅम्पसह नष्ट झालेल्या दहशतवादी छावण्यांचे व्हिडिओ सादर केले. जम्मू काश्मीर पोलिसांच्या ४ कर्मचाऱ्यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना येथे प्रशिक्षण मिळाले होते. 

07 May, 25 : 11:03 AM

"गेल्या ३ दशकापासून पाकिस्तान दहशतवाद्यांना खतपाणी घालतंय"

पहलगाम हल्ल्यात मारले गेलेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलाकडून ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. यात ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले. गेल्या ३ दशकांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांना खतपाणी घालतंय - कर्नल सोफिया कुरेशी 

07 May, 25 : 10:52 AM

यापुढेही भारतावर हल्ला होण्याची शक्यता

हल्ल्याच्या एक आठवड्यानंतरही पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात पाऊले उचलले नाहीत. उलट भारतावर आरोप लावले. भारताविरुद्ध यापुढेही हल्ले होण्याची शक्यता आहे त्यामुळे याला उत्तर देणे गरजेचे होते - परराष्ट्र सचिव

07 May, 25 : 10:49 AM

पहलगाम हल्ल्यात पाकचे कनेक्शन - भारत

पहलगाम हल्ल्याची जबाबदारी रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या गटाने स्वीकारली. हा गट लष्कर ए तोयबाशी जोडलेला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचे संबंध असल्याचं उघड झाले आहे. पहलगाम हल्ल्यात पर्यटकांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले. जम्मू काश्मीरात पर्यटन बहरत असताना हेतुपरस्पर हा हल्ला घडवून तिथे नुकसान पोहचवण्याचा हेतू होता - विक्रम मिस्त्री, परराष्ट्र सचिव

07 May, 25 : 10:13 AM

सशस्त्र दलाचा भारताला अभिमान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी केले कौतुक

ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. भारत आणि भारतीयांवरील कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्याचा निर्धार मोदी सरकारचा आहे. भारत दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहे - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

 

07 May, 25 : 09:57 AM

'ऑपरेशन सिंदूर' बाबत सरकार देणार माहिती

07 May, 25 : 09:51 AM

भारत-पाकिस्तान आमचे शेजारी, दोन्ही देशांनी संयम ठेवावा - चीन

भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक आहे. सध्याच्या परिस्थितीवर आम्हाला चिंता वाटते. भारत-पाकिस्तान दोन्ही आमचे शेजारी आहेत. चीन सर्वप्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता, संयम बाळगावा असं आवाहन चीनकडून करण्यात आले आहे.  

07 May, 25 : 09:16 AM

पाकिस्तानी सैन्याचं नापाक कृत्य, भारतीय नागरिकांवर गोळीबार

भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान बिथरला, पाक सैन्यातून भारतीय नागरिकांवर गोळीबार, सीमेजवळील गावांवर गोळीबारी सुरू 

07 May, 25 : 09:02 AM

खबरदारी म्हणून जैसलमेर इथं शाळांना सुट्टी जाहीर

भारतीय सैन्याने पाकवर स्ट्राईक केल्यानंतर सीमेजवळील शहरांमध्ये सतर्कता बाळगली जात आहे. राजस्थानच्या जैसलमेर येथे आज सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जारी करण्यात आली आहे. 

07 May, 25 : 08:41 AM

भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान, राहुल गांधींची प्रतिक्रिया

07 May, 25 : 08:36 AM

"भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास"

भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवला- शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री

 

07 May, 25 : 07:46 AM

औवेंसींनी केले भारतीय सैन्य दलाच्या हल्ल्याचं स्वागत


भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यावर एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पोस्ट करत म्हटलंय की, "आमच्या संरक्षण दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या टार्गेट हल्ल्यांचे मी स्वागत करतो. पाकिस्तानी डीप स्टेटला कठोर धडा शिकवला पाहिजे जेणेकरून पुन्हा कधीही पहलगाम होणार नाही. पाकिस्तानचा दहशतवादी ढाचा पूर्णपणे नष्ट केला पाहिजे. जय हिंद!"

07 May, 25 : 07:43 AM

भारतीय हवाई हल्ल्यात ९० दहशतवादी ठार

भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात ८० ते ९० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची बातमी आहे. बहावलपूर आणि मुरीदके इथं ३० दहशतवादी मारले गेले.

07 May, 25 : 07:31 AM

जैश ए मोहम्मदचं बहावलपूर येथील मुख्यालय उद्ध्वस्त

मरकज सुभान अल्लाह, जैश ए मोहम्मद बहावलपूर, पंजाब पाकिस्तान, हे मरकज जैश ए मोहम्मदचे ऑपरेशनल मुख्यालय म्हणून काम करत होते. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यात जैश दहशतवादी संघटनेचा हात होता. पुलवामातील दहशतवाद्यांना या छावणीत प्रशिक्षण देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. भारतीय सैन्याने या ठिकाणावर हल्ला केला आहे. 

Web Title: Operation Sindoor Live Updates: India strikes Pakistan, India Strikes Terror Camps in Pakistan, PoK after pahalgam terror attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.