आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पहिल्या सात सामन्यात अपराजित राहिलेल्या पंजाब किंग्सच्या संघावर सलग पाचव्या पराभवाची नामुष्की ओढावली. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात स्पर्धेबाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने श्रेयस अय्यरच्या संघाला पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे पंजाब किंग्ससाठी प्लेऑफ्सचं समीकरण अवघड झाले आहे. हा पराभव पचवणं कठीण असल्याचे सांगत श्रेयस अय्यरने उर्वरित दोन्ही सामने जिंकून प्लेऑफ्स गाठू असा विश्वास व्यक्त केला. एवढेच नाही तर सामन्याचा हिरो ठरलेला तिलक वर्माच्या खेळीचही त्याने मोठ्या मनानं कौतुक केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पराभवानंतर काय म्हणाला श्रेयस अय्यर?
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पराभवानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, “हा पराभव पचवणं निश्चितच कठीण आहे. पण मी कोणत्याही एका गोष्टीला दोष देणार नाही. हा सामना सर्वोत्तम सामन्यांपैकी एक होता. दोन्ही संघांनी चांगली झुंज दिली. तिलक वर्माने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने शॉट्सची निवड खूप चांगल्या पद्धतीने केली." हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला, असे म्हणत पंजाब किंग्सच्या कर्णधारानं मोठ्या मनानं तिलक वर्माचं कौतुक केले.
IPL 2026 मधील दमदार कामगिरीचं फळ! वैभव सूर्यवंशीसह या ५ खेळाडूंना टीम इंडियात संधी
ओमरझाईचंही कौतुक
अझमातुल्लाह ओमरझाई बद्दल बोलताना श्रेयस पुढे म्हणाला की, आम्ही एका टप्प्यावर १७०-१८० धावांपर्यंत जाऊ, असं वाटत होतं. पण त्याने (ओमरझाई) खेळाचं चित्रच बदलून टाकलं. अप्रतिम स्कूप शॉट्सवर मारलेले षटकार निर्णायक ठरले. १६ व्या षटकानंतर आम्ही पूर्णपणे लय मिळवली. त्यामुळेच संघाच्या धावफलकावर २०० धावा लावता आल्या.
प्लेऑफ्सचं तिकीट मिळवण्याचा विश्वास
”आमचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध आहे. दुपारचा सामना असल्यामुळे आम्ही उत्सुक आहोत. उरलेल्या दोनपैकी दोन सामने जिंकणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. हे दोन्ही सामने रोमांचक असतील. त्यासाठी आम्ही आतुर आहोत.” अशा शब्दांत त्याने प्लेऑफ्सचं तिकीट मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.