ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 08:09 IST2026-05-06T08:08:36+5:302026-05-06T08:09:38+5:30
अशी होती शाह यांची रणनीती... ज्यामुळे तृणमूल काँग्रेस झाली चारी मुंड्या चीत

ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
नवी दिल्ली :पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयामागे भाजपचे निवडणूक चाणक्य गृहमंत्री अमित शाह यांची रणनीती निर्णायक ठरली. निवडणुकीच्या अनेक महिने आधीपासूनच सुरू केलेले माइक्रो-मॅनेजमेंट, अचूक डेटा-आधारित नियोजन आणि ‘सीट मॅपिंग’मुळे पक्षाने प्रत्येक मतदारसंघात भक्कम पायाभरणी केली. ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ अभियानाच्या माध्यमातून बूथ स्तरावर कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे उभे करण्यात आले.
प्रचारात घुसखोरी, सीमा सुरक्षा, भ्रष्टाचार आणि ‘कट मनी’ यांसारख्या जनभावनांना भिडणाऱ्या मुद्द्यांना प्राधान्य देत मतदारांमध्ये परिवर्तनाची भावना निर्माण करण्यात आली. महिलांसाठी आर्थिक सहाय्य आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसारख्या आश्वासनांनीही मतदारांना आकर्षित केले. मजबूत संघटनात्मक टीम, प्रभावी डिजिटल प्रचार व मनोवैज्ञानिक आघाडी यांचा संगम साधत भाजपने मतदारांमध्ये विजयाचा विश्वास निर्माण केला.
शाह यांची 'फॅब ५' टीम
अमित शाह यांनी पाच प्रमुख नेत्यांची एक विशेष टीम तयार केली होती, ज्यांनी मैदानात काम केले. या टीममध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी मुख्य रणनीतीकार म्हणून सामाजिक आणि जातीय समीकरणे जुळवली. भूपेंद्र यादव यांनी संघटनात्मक माइक्रो-मॅनेजमेंट आणि कायदेशीर आव्हाने हाताळली. सुनील बन्सल यांनी निवडणूक यंत्रणा आणि संघटन धारदार केले. बिप्लव देब यांनी त्रिपुरातील अनुभवाचा वापर करून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना सक्रिय केले. अमित मालवीय यांनी सोशल मीडिया आणि डिजिटल प्रचाराची आघाडी सांभाळली.
सांस्कृतिक आणि सामाजिक जोडणी
ममता बॅनर्जींच्या 'बाह्य शक्ती' या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी शहा यांनी बंगालच्या सांस्कृतिक वारशाचा वारंवार उल्लेख केला. गंगासागर आणि कपिल मुनी आश्रमाला दिलेली भेट ही स्थानिक अस्मितेशी जोडले जाण्याचाच एक भाग होता.
माइक्रो-मॅनेजमेंट, डेटा-आधारित रणनीती
बूथस्तरीय जाळे: त्यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाची मजबूत पकड निर्माण करण्यासाठी 'मेरा बूथ, सबसे मजबूत' अभियानांतर्गत कार्यकर्त्यांचे जाळे विणले.
रात्रीच्या बैठका: प्रचाराच्या काळात ते स्वतः १४-१५ दिवस बंगालमध्ये तळ ठोकून होते. दिवसा सभा आणि रोड शो केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ते स्थानिक नेत्यांसोबत संघटनात्मक बैठका घेत असत.
प्रभावी निवडणूक मुद्दे आणि नॅरेटिव्ह
घुसखोरी आणि सुरक्षा: बांगलादेश सीमा ४५ दिवसांत पूर्णपणे सील करण्याचे आणि घुसखोरांना बाहेर काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
भ्रष्टाचार आणि सिंडिकेट राज: तृणमूल काँग्रेसच्या 'कट मनी' संस्कृतीवर आणि भ्रष्टाचारावर त्यांनी कडाडून टीका केली, ज्यामुळे सामान्य जनतेमध्ये बदलाची लाट निर्माण झाली.
कल्याणकारी आश्वासने: महिलांसाठी ३,००० रुपयांचे मासिक मानधन व कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोगाची अंमलबजावणी यांसारख्या आश्वासनांनी मतदारांना आकर्षित केले.