"डोळा मारता, फ्लाईंग किस देता अन् म्हणता..."; अमित शाह यांनी राहुल गांधींना घेरलं; विरोधकांचा संताप अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 19:16 IST2026-03-11T19:15:54+5:302026-03-11T19:16:13+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींवर 'फ्लाइंग किस'वरून बोचरी टीका केली.

"डोळा मारता, फ्लाईंग किस देता अन् म्हणता..."; अमित शाह यांनी राहुल गांधींना घेरलं; विरोधकांचा संताप अनावर
Amit Shah on Rahul Gandhi: लोकसभेत बुधवारी मोठा राजकीय रणसंग्राम पाहायला मिळाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. मात्र, या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जुन्या वर्तणुकीचा पाढा वाचत त्यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. यानंतर संतापलेल्या विरोधकांनी सभागृहात गुंडागिरी बंद करा अशा घोषणा देत प्रचंड गदारोळ केला.
'हे सदन आहे, जत्रा नाही'; अमित शाह यांचा इशारा
चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी ५६ मिनिटांचे भाषण केले. सदन नियमानेच चालेल, ही काय जत्रा नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना फटकारले. लोकसभा अध्यक्षांना नियमबाह्य पद्धतीने वागणाऱ्यांना रोखण्याचा पूर्ण अधिकार आहे. जे नियमांचे उल्लंघन करतील, त्यांचा माईक बंदच होईल," असे शाह यांनी ठणकावून सांगितले.
राहुल गांधींच्या 'त्या' कृतींवरून शाह यांचा हल्लाबोल
राहुल गांधींचे नाव न घेता अमित शाह यांनी त्यांच्या संसदेतील मागील वर्तणुकीवर कडाडून टीका केली. "कधी तुम्ही सभागृहात डोळा मारता, कधी फ्लाइंग किस देता, तर कधी अचानक जाऊन पंतप्रधानांना मिठी मारता... अशा प्रकारच्या अजब वागणुकीनंतरही तुम्ही म्हणता की आम्हाला बोलू दिले जात नाही?" असं अमित शाह म्हणाले.
शाह यांच्या या विधानामुळे विरोधक कमालीचे आक्रमक झाले. काँग्रेस खासदारांनी वेलमध्ये धाव घेत गुंडागिरी बंद करा आणि माफी मागा अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.
'अध्यक्षांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे दुर्दैवी'
अमित शाह यांनी अविश्वास प्रस्तावावर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, "जेव्हा सभागृहाच्या प्रमुखाच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह उभे केले जाते, तेव्हा जगासमोर भारताच्या लोकशाहीची प्रतिमा मलिन होते. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्षांच्या चेंबरमध्ये जो प्रकार घडला, तो पाहता त्यांच्या सुरक्षेची चिंता निर्माण झाली होती."
'असंसदीय असेल तर शब्द काढून टाका'
गदारोळ वाढल्यानंतर अमित शाह यांनी आव्हान दिले की, "मी जे काही बोललो त्यात काहीही चुकीचे नाही. तरीही माझ्या भाषणात कोणताही शब्द असंसदीय आढळल्यास तो कामकाजातून काढून टाकावा." यावर पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी रेकॉर्ड तपासून आक्षेपार्ह शब्द काढून टाकण्याचे आश्वासन दिल्यानंतर सभागृहाचे कामकाज काहीसे शांत झाले.