बेशिस्त प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेचा जालीम उपाय; बेमुर्वतखोर प्रवाशांना धडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 23:11 IST2026-04-20T23:09:15+5:302026-04-20T23:11:19+5:30
ट्रेन किंवा रेल्वे स्थानकावर घाण केल्यास 'सफाई'ची शिक्षा

AI Generated Image
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छोट्या मोठ्या रकमेच्या दंडाला बेशिस्त जुमानत नसल्याने त्यांना वठणीवर आणण्यासाठी भारतीय रेल्वेने एक जालीम उपाय शोधला आहे. त्यानुसार, आता रेल्वे स्थानकावर घाण करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी केलेली घाण स्वत:च साफ करावी लागणार आहे. बेमुर्वतखोर प्रवाशांना धडा शिकविण्यासाठी, त्यांच्यात बदल घडविण्यासाठी ही शिक्षा दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी आज चर्चेअंती स्पष्ट केले आहे.
रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्थानक परिसरात जागोजागी स्वच्छतेचा संदेश बघायला मिळतात. 'कृपया घाण, कचरा करू नका. स्वच्छता राखा', असे हे संदेश असतात अन् त्यासोबतच 'रेल्वे गाड्यात, स्थानकावर, परिसरात घाण कचरा करणे, धूम्रपान करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यासाठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते,' असेही नमूद असते. मात्र, त्याला अनेक बेपर्वा प्रवासी जुमानत नाही, ते बिनधास्त खर्रा, पान खाऊन जागोजागी पिचकाऱ्या मारतात. विड्या, सिगारेटचे धूर तोंडातून सोडून उग्र दर्प पसरवतात. यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होतात. अशा बेशिस्त प्रवाशांपैकी मोजक्या जणांना पकडून आरपीएफ किंवा जीआरपीचे जवान त्यांच्यावर दंड ठोकतात. ही रक्कम किरकोळ, अर्थात २०० रुपये असल्याने प्रवासी त्याला जुमानत नाही. ते पुन्हा पुन्हा हा गुन्हा करतात. ते लक्षात घेऊन आता अशा प्रवाशांना धडा शिकविण्यासाठी दंड आकारण्याऐवजी ‘सार्वजनिक सेवा’ करण्याची शिक्षा देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
‘जन विश्वास २.० संशोधन विधेयक २०२६’ अंतर्गत ही 'दंड आणि कम्युनिटी सर्विस’ ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे अधिकारी सांगतात. त्यामुळे अशा किरकोळ गुन्ह्यांसाठी तुरुंग किंवा दंडाच्या शिक्षेऐवजी त्या प्रवाशांना रेल्वे स्थानकावर केलेली घाण साफ करण्याची शिक्षा वजा सेवा देण्यात येणार आहे.
अधिकारी म्हणतात...
"प्रवाशांच्या वर्तनात सकारात्मक बदल व्हावा, असा या निर्णयामागे उद्देश आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत अद्याप 'ऑफिशियल' असे काही प्राप्त झाले नाही. त्यामुळे 'सफाईच्या शिक्षे'ची अंमलबजावणी नेमकी कधी सुरू होणार, ते स्पष्ट नाही."
-अमन मित्तल, विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर
"आज हे वृत्त कळले. यासंबंधीच्या कायदेशीर बाबी आम्ही (आरपीएफ) हाताळू. मुख्य जबाबदारी रेल्वे कर्मचाऱ्यांची राहणार आहे."
-दीपचंद्र आर्य, विभागीय सुरक्षा आयुक्त, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर.