९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 21:59 IST2026-04-20T21:59:28+5:302026-04-20T21:59:48+5:30
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ९३ दिवस 'ऑपरेशन महादेव' राबवले.

९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
पहलगामच्या निसर्गरम्य परिसरात पर्यटकांच्या रक्ताने होळी खेळणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने यमसदनी धाडले आहे. तब्बल ९३ दिवस चाललेले 'ऑपरेशन महादेव' यशस्वी झाले असून, लष्कराने लश्कर-ए-तैयबाच्या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या शत्रूला सोडले जाणार नाही, हाच इशारा या कारवाईतून लष्कराने दिला आहे.
२२ एप्रिलचा तो काळा दिवस
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगामच्या बैसरन भागात दहशतवाद्यांनी निर्दोष पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. मात्र, हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी शांत न बसता या नराधमांचा शोध सुरू केला. चश्मदीद आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आणि 'ऑपरेशन महादेव'ची आखणी करण्यात आली.
दाचीगामच्या घनदाट जंगलात मृत्यूचा सापळा
तपासात असे समोर आले की, हे दहशतवादी दक्षिण काश्मीरच्या डोंगरदऱ्यातून पळून दाचीगामच्या घनदाट जंगलात लपले आहेत. हे जंगल इतके भयावह आणि दुर्गम आहे की तिथे मोहीम राबवणे लष्करासाठी मोठे आव्हान होते. मात्र, भारतीय लष्कराने पॅरा स्पेशल फोर्सेसला पाचारण केले आणि दहशतवाद्यांच्या सुटकेचे सर्व मार्ग बंद केले.
ड्रोन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
दहशतवाद्यांच्या हालचाली टिपण्यासाठी लष्कराने ड्रोन आणि हाय-टेक कॅमेऱ्यांची मदत घेतली. १० जुलै २०२५ रोजी हे ऑपरेशन निर्णायक टप्प्यात पोहोचले. सुरक्षा दलांनी या तिन्ही दहशतवाद्यांना एका मर्यादित परिसरात वेढा घातला.
१० तासांची पायपीट अन् अंतिम प्रहार
२८ जुलै २०२५ ची पहाट या दहशतवाद्यांसाठी अखेरची ठरली. पॅरा स्पेशल फोर्सेसच्या टीमने अत्यंत कठीण पहाडी वाटेने सुमारे १० तास सलग पायपीट करत दहशतवाद्यांच्या अड्ड्यापर्यंत मजल मारली. तिथे झालेल्या जोरदार चकमकीत लष्कराने तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हे ऑपरेशन भारतीय लष्कराचे धाडस, अजोड रणनीती आणि संकल्पाचे प्रतीक मानले जात आहे. पर्यटकांवर हल्ला करून काश्मीरचे शांततामय वातावरण बिघडवू पाहणाऱ्यांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.