कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 22:29 IST2026-04-20T22:29:16+5:302026-04-20T22:29:56+5:30
मी स्वभावाला राेखठोक अन् हिशोबाला चोख; साताऱ्यात खालच्या पातळीवरील राजकारण

कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
नितीन काळेल
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा ही इतिहास, विकासाचा संगम असणारी आणि संस्कृती जपणारी भूमी आहे. इथं वाकडं-तिकडं करुन चालत नाही. आता जिल्ह्यात जे राजकारण झालं ते खालच्या पातळीवरील झाले. साताऱ्यातील जनता हे सहन करणार नाही. साताऱ्याचं रक्त वेगळं आहे. त्यामुळे यावर योग्यवेळी बोलेन. मी साताऱ्याचा सूपूत्र असून कार्यकर्ता अपमानीत होतो तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा होतो. मी स्वभावाला रोखठोक आणि हिशोबाला चोख आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकप्रकारे भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांना दिला.
सातारा येथील गांधी मैदानावर शिंदेसेनेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नूतन सदस्य सत्कार आणि जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुहास बाबर, माजी आमदार दीपक चव्हाण, रवींद्र धंगेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, संपर्क प्रमुख शरद कणसे, चंद्रहार पाटील, जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, चंद्रकांत जाधव, अंकुश कदम आदी उपस्थित होते. दरम्यान, या मेळाव्यात अनेकांचा पक्षप्रवेश सोहळाही पार पडला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सत्ता आणि पदे येतात-जातात. पण, नाव गेलेतर परत येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणीही झाला असलातरी लोकांच्या मनातील अध्यक्ष हा शिंदेसेनेचाच आहे. येथील जनतेने शिंदेसेनेलाच साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. नकला करणारे संपले. चांदा ते बांदा शिंदेसेना आहे. मी घरात बसून काम करत नाही. आॅनफिल्ड असतो. सातारा जिल्ह्याच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही.
पालकमंत्री देसाई यांनी सातारा जिल्ह्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितींची निवडणूक झाली. जिल्ह्यात शिंदेसेनेची ताकद वाढत आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, शिंदेसेना तसेच इतर मिळून ३७ सदस्य होते. बहुमत असूनही अध्यक्ष, उपाध्यक्ष आपले झाले नाहीत. या निवडणुकांत महायुती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही, अशी खंत बोलून दाखविली.
आयटी पार्कला मंजुरी अन् फलटण एमआयडीसी पूर्ण करणार...
या मेळाव्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी साताऱ्यातील आयटी पार्क १५ दिवसांत मंजूर होईल. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना राेजगार मिळेल. तसेच फलटणची एमआयडीसीही लवकरच पूर्ण करणार आहे, असे जाहीर करुन टाकले. तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सातारा जिल्ह्यात जे राजकारण झाले ते देशानेही पाहिले. लोकशाही पायदळी तुडवली असे सांगून त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.