औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 23:39 IST2026-04-20T23:39:24+5:302026-04-20T23:39:48+5:30
परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने उन्हाची तीव्रता वाढत असून, तापमानाचा पारा ४० अंशावर आहे.

औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
औराद शहाजानी (जि. लातूर) : परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने उन्हाची तीव्रता वाढत असून, तापमानाचा पारा ४० अंशावर आहे. परिणामी, अंगाची लाहीलाही हाेत आहे. शेतकरी लक्ष्मण दादाराव भंडारे (वय ६०) हे साेमवारी शेतात काम करताना अचानक जमिनीवर खाली काेसळले. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन हृदयाचा तीव्र झटका आल्याने त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात १० एप्रिलपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. कमाल तापमान ४२.८ अंशावर पोहोचले आहे तर किमान तापमान ३१.५ अंशावर आले आहे. परिणामी, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे रात्रंदिवस अंगाची लाहीलाही होत आहे. यातच शेतकरी लक्ष्मण दादाराव भंडारे हे सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान शेतात काम करीत हाेते. यावेळी ते अचानक जमिनीवर कोसळले. त्यांना उपचारासाठी औराद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी त्यांना निलंगा येथे पाठविले. दरम्यान, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, सून, नातू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उन्हाच्या तीव्रतेने पाणीपातळी कमी झाली...
शेतकरी लक्ष्मण भंडारे यांनी दिवसभर शेतात काम केले होते. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने शरीरातील पाणीपातळी कमी झाली आणि तीव्र हृदयविकाराचा धक्का बसला. प्राथमिक तपासणी करून पुढील उपचारासाठी निलंगा येथे पाठविण्यात आले. मात्र, वाटेतच मृत्यू झाला. - डाॅ. मल्लिकार्जुन शंकद, औराद शहाजानी