नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 13:48 IST2026-04-20T13:48:00+5:302026-04-20T13:48:26+5:30
Nashik TCS Case Update : नाशिकच्या टीसीएस बीपीओमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील धक्कादायक खुलासे. रजा मेमनने विवाहित महिलेचा कसा छळ केला आणि वरिष्ठांनी त्याला कसे वाचवले, याबद्दलचा पीडितेचा संपूर्ण जबाब वाचा.

नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
कॉर्पोरेट विश्वाला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्याटाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लैंगिक छळवणूक आणि धर्मांतरण प्रकरणात पोलिसांनी पाचवा संशयित आरोपी रझा मेमन याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील चौथ्या पीडित महिलेने समोर येऊन आपला जबाब नोंदवला असून, त्यातून कंपनीतील वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या विकृत मानसिकतेचा पर्दाफाश झाला आहे. "हा विषय आपल्या दोघांमध्येच गुपित ठेव," असे म्हणत रझा मेमनने या पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे समोर आले आहे.
पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, मे २०२३ मध्ये ट्रेनिंग सुरू असताना ती रूममध्ये एकटी होती. तेव्हा रझाने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला काही 'कोडी' घातली आणि त्याचे उत्तर मेसेजवर देण्यास सांगितले. "मी तुला अशी कोडी घालत राहीन, तू मला टीम्सवर उत्तर देत जा, पण हे आपल्या दोघांमध्येच सीक्रेट ठेव," अशी अट त्याने घातली. पीडिता नवीन असल्याने दबावाखाली तिने ही गोष्ट कोणाला सांगितली नाही.
विवाहित आयुष्यावर अश्लील भाष्य
नोव्हेंबर २०२५ मध्ये पीडितेचे लग्न झाले. त्यानंतर रझा मेमनचा त्रास अधिकच वाढला. जेव्हा पीडिता दुपारी ऑफिसमध्ये थोडा वेळ विश्रांती घेत असे, तेव्हा रझा तिच्या लग्नाचा संदर्भ देऊन अश्लील टिप्पणी करायचा. "लग्न झाल्यावर रात्री झोपायला हवे, तू रात्री नक्की कशात इतकी व्यस्त असतेस?" असे घाणेरडे प्रश्न तो विचारत असे. इतकेच नाही तर फेब्रुवारी २०२६ मध्ये जेव्हा ती पतीसोबत गोव्याला जाण्यासाठी रजा मागण्यास गेली, तेव्हा "तू हनिमूनला जातेयस का? दारू पितेस का? तुम्हाला थंड हवेच्या ठिकाणी जायला हवे होते," असे म्हणत त्याने तिला अत्यंत गलिच्छ नजरेने पाहिले.
बदल्याच्या भावनेतून कामाचा छळ
पीडितेने जेव्हा रझाकडे दुर्लक्ष करणे सुरू केले, तेव्हा त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या (दानिश आणि तौसीफ) मदतीने तिच्या सिस्टममध्ये छेडछाड केली. नियमानुसार दर ३० सेकंदांनी येणारा कॉल, रझाने सेटिंग्स बदलून दर १ सेकंदाला येईल असे केले. यामुळे पीडितेवर कामाचा प्रचंड ताण वाढला.
वरिष्ठांकडून आरोपींना अभय
या छळाबाबत पीडितेने हेड अश्विनी चैनानी यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी पीडितेलाच गप्प राहण्यास सांगितले. "तुला उगीच चर्चेत का यायचे आहे? हा विषय इथेच संपवून टाक," असे म्हणत त्यांनी रझा, दानिश आणि तौसीफ यांचा बचाव केला. यामुळे रझाचे धैर्य अधिकच वाढत जात होते आणि तो इतर महिला कर्मचाऱ्यांनाही त्रास देऊ लागला.
गुढीपाडव्याचा तो प्रसंग
१९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी पीडिता साडी नेसून ऑफिसला आली होती. तेव्हा संशयित शाहरुख याने तिला अश्लील नजरेने पाहत आणि "आज तू खूप वेगळी दिसतेयस, आपण बाहेर फिरायला जाऊया का?" अशी विचारणा केली.