Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 14:34 IST2026-04-19T14:33:16+5:302026-04-19T14:34:43+5:30
Mumbai Pune Expressway Missing Link Updates: मिसिंग लिंकचे लोकार्पण झाल्यावर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे घाट वळसा टळणार असून प्रवासाचा ३० मिनिटांचा अवधी वाचणार असल्याचे म्हटले जात आहे.

Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
Mumbai Pune Expressway Missing Link Updates:पुणे-मुंबई प्रवास म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात ते खंडाळा घाटातील डोंगर, धबधबे आणि तितकीच भीतिदायक वाहतूक कोंडी! अशा ‘ट्रॅफिक जॅम’वर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ‘मिसिंग लिंक’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे बघितले जात आहे. हा प्रकल्प आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनी तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच या मार्गावर चाचण्या सुरू होतील, असे सांगितले जात आहे.
या मार्गावरील खंडाळा एक्झिटपासून खोपोलीपर्यंतचा भाग जीवघेण्या वळणांचा आणि तीव्र उताराचा आहे. हाच भाग ‘ब्लॅक स्पॉट’ बनला आहे. तीव्र वळणावर टँकर उलटण्याचे अथवा अपघातांचे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी ‘मिसिंग लिंक’च्या माध्यमातून लोणावळा आणि खंडाळा घाट टाळून थेट बोगदा तयार करण्यात आला आहे. या नवीन मार्गामुळे वळणावळणाच्या घाटातून जाण्याची गरज उरणार नाही. यातच राज्य सरकारने लोकार्पणासाठी वेळ दिल्यानंतर एक मार्गिका सेवेत दाखल केली जाणार आहे.
१३.३ किमीच्या मार्गिकेचे काम जवळपास पूर्ण
मुंबईपुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक म्हणजेच खोपोली – कुसगाव दरम्यानच्या १३.३ किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे काम जवळपास पूर्ण झाल्याचे म्हटले जात आहे. सध्या प्रकल्पाच्या कामावरून अखेरचा हात फिरविण्यात येत आहे. लवकरच या मार्गिकेवर चाचण्यांना सुरुवात केली जाणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग २००२ मध्ये सेवेत दाखल करण्यात आला होता. आताच्या घडीला सर्वाधिक वर्दळीचा असा हा महामार्ग ठरला असून, दररोज ७० हजारांहून अधिक वाहने याचा वापर करतात, असे सांगितले जाते.
दरम्यान, हा महामार्ग आताच वाहनांना सामावून घेण्यासाठी अपुरा पडत आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत असून अपघातांची भीतीही वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन एमएसआरडीसीने महामार्गाचे दहा पदरीकरण करण्यासह मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यास द्रुतगती महामार्गावरील घाटाचा वळसा टळणार असून प्रवासाचा ३० मिनिटांचा अवधी वाचणार आहे.