४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
By शुभांगी काळमेघ | Updated: October 4, 2025 18:15 IST2025-10-04T18:12:05+5:302025-10-04T18:15:26+5:30
Nagpur : या प्रकरणाची एफआयआर दाखल झाल्यानंतर दोन वर्षांनी कारवाई करण्यात येत आहे त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार हा घोटाळा केवळ बँक कर्जापुरता मर्यादित नसून रमनराव बोल्लाने १५१ शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या नावे कोटींचे कर्जे उचलले, ज्याची किंमत १५१ कोटींच्यावर जाते.

Loans worth crores sanctioned in 48 hours! Loan scam in the name of farmers in Bhandara, Nagpur districts; ED takes action
नागपूर : नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावावर बनावट कर्ज घेत ११३ कोटी रुपयांपर्यंतचा बँक कर्ज घोटाळा उघड झाला आहे, या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखाने (ईडी) तातडीने छापेमारी करून मोठे दस्तऐवज, मालमत्ता आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत.या प्रकरणात रमनराव बोल्ला आणि नुतन राकेश सिंह ही नावे समोर येत आहेत.
या प्रकरणाची एफआयआर दाखल झाल्यानंतर दोन वर्षांनी कारवाई करण्यात येत आहे त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार हा घोटाळा केवळ बँक कर्जापुरता मर्यादित नसून रमनराव बोल्लाने १५१ शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या नावे कोटींचे कर्जे उचलले, ज्याची किंमत १५१ कोटींच्यावर जाते.
ईडीने एकूण आठ ठिकाणांवर छापेमारी केली असून, त्या ठिकाणी नागपूर आणि भंडारा जिल्हा तसेच आंध्र प्रदेशातील गुंटूरही सामील आहे. छापेमारी दरम्यान दस्तऐवज, मालमत्ता कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि १० लाख रोख जप्त करण्यात आली आहे. आणि याशिवाय चालू बँक बॅलन्स, विमा पॉलिसी, चल संपत्ती गोठविण्यात आली. या घोटाळ्याशी संबंधित गोठवण्यात आलेल्या मालमत्तांची किंमत एकूण १०० कोटींपर्यंत असल्याचे ईडीने सांगितले आहे.
या प्रकरणात मुख्यतः १५८ कोटी शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज मंजूर करण्यात आले होते आणि त्यातील ११३ कोटी इतकी रक्कम या कर्जातून वळविण्यात आली आहे. आरोपींनी शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देण्याच्या सांगण्यावरून त्यांच्याकडून आधार, पॅन कार्ड इत्यादी दस्तऐवज घेतले व त्यांचा वापर करून खोटे कर्ज खाते सुरू केले. कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया अत्यंत जलद रित्या चालवली गेली, काही वेळा फक्त ४८ तासांत कर्ज मंजूर झाले असल्याचे तपासात उघड झाले आहे.
तेव्हाची कॉपरेटिव्ह बँक म्हणजेच आताची युनिअन बँकेचे मॅनेजर संदीप जंगले यांच्या साहाय्याने बोल्ला याने प्रत्येक शेतकऱ्यांच्या नावावर ५० लाख रुपये इतके कर्ज काढले ज्यामध्ये तो स्वतः गॅरंटर बनला.आणि त्याने ते कर्ज शेतीच्या कामासाठी न लावता त्याच्या वैयक्तिक कर्जाच्या खात्यात वळवले ज्यामुळे बँकेला मोठा तोटा सहन करावा लागला.
ईडीने आणखी एक सारखेच प्रकरण उघडकीस काढले आहे ज्यामध्ये मुख्य आरोपी राकेश सिंगची पत्नी नूतन सिंग असल्याचं सांगितल्या जात आहे. सारख्याच अधिकाऱ्यांच्या साहाय्याने नूतन सिंगने देखील ५४ शेतकऱ्यांच्या नावावर तब्बल ३९.४३ करोड रुपयांचे कर्ज काढले. ज्यामध्ये ती स्वतः गॅरंटर बनली.
तपासात समोर आले आहे की बोल्ला आणि सिंग दोघांनी शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज घेऊन ते पैसे त्यांच्या नावे वैयक्तिक संपत्ती घेण्यासाठी वापरली किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावे घेण्यात आली. त्यातील काही पैसे त्यांचे काही जुने कर्ज फेडण्यासाठीदेखिल वापरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा घोटाळा ना केवळ शेतकऱ्यांना फसवणारा आहे तर यामुळे बँकिंग क्षेत्रात देखील खूप मोठा परिणाम होणार असल्याचे सांगितल्या जात आहे.