उद्धवसेनेच्या उमेदवारास 'मशाल' चिन्ह नाकारले; निवडणूक अधिकारी- दानवे समोरासमोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 19:35 IST2026-01-03T19:32:39+5:302026-01-03T19:35:14+5:30
उच्च न्यायालयाचा आदेश डावलल्याचा आरोप; निवडणूक कार्यालयात विचारला जाब

उद्धवसेनेच्या उमेदवारास 'मशाल' चिन्ह नाकारले; निवडणूक अधिकारी- दानवे समोरासमोर
छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ४ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार सावित्रीबाई हिरालाल वाणी यांना निवडणूक चिन्ह देण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही 'मशाल' चिन्ह देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात थेट धडक दिली.
न्यायालयाचा आदेश डावलल्याचा आरोप
अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढवत असलेल्या सावित्रीबाई वाणी यांना मशाल चिन्ह मिळावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, निवडणूक यंत्रणेकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. चिन्हाअभावी उमेदवाराचा प्रचार थांबला असून, हा लोकशाही आणि न्यायालयीन मूल्यांवर आघात असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.
आंदोलनाचा इशारा
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अंबादास दानवे यांनी राज्य मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि मनपा आयुक्तांशी फोनवरून संवाद साधला. "उच्च न्यायालयाचा आदेश डावलण्याचा अधिकार कोणालाही नाही. तातडीने अंमलबजावणी न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल," असा इशारा दानवे यांनी यावेळी दिला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि सावित्रीबाई वाणी यांचे समर्थक उपस्थित होते.