मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 07:19 IST2026-04-19T07:18:18+5:302026-04-19T07:19:20+5:30
विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या माहितीनुसार, मुंबई शहरात सध्या किमान ८३७ रुग्ण यकृत प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत आहेत.

मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या माहितीनुसार, शहरात सध्या किमान ८३७ रुग्ण यकृत प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत आहेत. मात्र तज्ञांच्या मते, ही संख्या प्रत्यक्षात याहून अधिक असण्याची शक्यता आहे. कारण अनेक रुग्ण माहितीच्या अभावामुळे किंवा महागड्या उपचारांचा खर्च परवडत नसल्यामुळे नोंदणीच करत नसल्याचे चित्र आहे. १९ एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या जागतिक यकृत (लिव्हर) दिनानिमित्त ही चिंताजनक बाब समोर आली आहे.
अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांमध्ये मोठी प्रगती झाली आहे. यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. परिणामी, विविध कारणांमुळे यकृत निकामी झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून ते प्रत्यारोपणासाठी पुढे येत आहेत. मात्र उपलब्ध दात्यांची संख्या अत्यल्प असल्याने प्रतीक्षा यादी दिवसेंदिवस वाढत आहे.
राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची प्रतीक्षा मोठी यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही. याकरिता अवयवदान जनजागृतीची गरज असून, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव दान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, यकृत निकामी झालेल्यांची संख्या मोठी आहे. अनेक रुग्णांना महागड्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नाही म्हणून यकृतासाठीची नोंदणी करून ठेवत नाहीत. तर काहींना अद्याप याबाबत माहितीच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जनजागृती हवीच.