Eknath Shinde: 'मुंबईचा महापौर मराठीच होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ' वरळीतील सभेत एकनाथ शिंदे कडाडले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 21:48 IST2026-01-03T21:47:48+5:302026-01-03T21:48:50+5:30
Maharashtra Municipal Corporation Election: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने आज प्रचाराचा नारळ फोडला.

Eknath Shinde: 'मुंबईचा महापौर मराठीच होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ' वरळीतील सभेत एकनाथ शिंदे कडाडले!
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने आज प्रचाराचा नारळ फोडला. वरळीतील एनएससीआय डोममध्ये भाजप आणि शिवसेना यांची संयुक्त जाहीर सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "ही केवळ प्रचाराची सुरुवात नाही, तर विजयाची नांदी आहे. मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला आत्मविश्वास व्यक्त केला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, "तुम्ही फक्त मुंबईला लुटण्याचे काम केले. तुम्हाला तुमचे स्वतःचे राजकीय भविष्य सुरक्षित करायचे आहे, तर आम्हाला सर्वसामान्य मुंबईकरांचे भवितव्य सुरक्षित करायचे आहे, हाच आपल्यातील मुख्य फरक आहे." मराठी अस्मिता आणि मराठी बाणा विकल्याचा आरोप करत आम्ही जीव गेला तरी कोणासमोर लाचार होणार नाही," असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला.
"गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईला भ्रष्टाचाराची मगरमिठी पडली होती. मुंबईची लूट करणाऱ्या या बकासुराच्या तावडीतून आता मुंबईकरांना सोडवायचे आहे. त्यासाठी महायुतीचा बलभीम सज्ज झाला आहे. लाडके मुंबईकर या मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत. मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकणारच, पण त्याचसोबत मुंबईचा महापौरही हा मराठीच होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे", असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई तोडण्याचे 'फेक नरेटिव्ह' आता चालणार नाही
निवडणुकीच्या काळात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार, असा जो प्रचार केला जातो, त्यावरून शिंदेंनी विरोधकांचा समाचार घेतला. "मुंबई कधीही धोक्यात नव्हती, तर तुमचे राजकारण धोक्यात आले आहे. कोणाच्याही बापात हिंमत नाही की, तो मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करेल. मुंबईला आता विकासाचे मारेकरी नको, तर विकासाचे वारकरी हवे आहेत," असे शिंदे म्हणाले. तसेच, "दिवसभर नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स, हा काळ आता संपला आहे," अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
'शत्रू कपटी आहे, गाफील राहू नका'
विजयाचा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. "विजय आपलाच आहे, पण गाफील राहू नका. आपला शत्रू कपटी, धोकेबाज आणि पाताळयंत्री आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत गाफील न राहता कामाला लागा," असे आवाहन त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.