हलगर्जीपणाचा कळस! दीडवर्ष असह्य वेदना; ऑपरेशन करताना पोटात विसरले कात्री, महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 18:59 IST2026-01-03T18:58:33+5:302026-01-03T18:59:37+5:30
ऑपरेशनदरम्यान पोटात कात्री राहिल्यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

हलगर्जीपणाचा कळस! दीडवर्ष असह्य वेदना; ऑपरेशन करताना पोटात विसरले कात्री, महिलेचा मृत्यू
बिहारच्या मोतिहारीमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑपरेशनदरम्यान पोटात कात्री राहिल्यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. कुटुंबाने डॉक्टरवर गंभीर आरोप केले असून प्रसूतीदरम्यान डॉक्टरांनी पोटात कात्री सोडली होती, असा दावा त्यांनी केला आहे. यामुळे महिलेला सतत पोटदुखीचा त्रास होत होता. दीड वर्ष अनेक तपासण्या करूनही काहीच निष्पन्न झालं नाही, मात्र दुसऱ्या डॉक्टरांनी जेव्हा सीटी स्कॅन केला, तेव्हा पोटात कात्री असल्याचं पाहून त्यांनाही मोठा धक्का बसला. अखेर उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. उषा देवी असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून ती जितना पोलीस ठाणे परिसरातील मणिभूषण कुमार यांची पत्नी होती. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, दीड वर्षांपूर्वी उषा देवी गरोदर असताना तिला प्रसूतीसाठी शहरातील डॉक्टर संगीता कुमारी यांच्या क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तपासणीनंतर डॉक्टरांनी सिझर करण्याचा सल्ला दिला, ज्याला कुटुंबीयांनी संमती दिली. यानंतर उषा देवी यांनी एका मुलीला जन्म दिला होता.
दीड वर्ष सहन केल्या वेदना
ऑपरेशननंतर काही दिवसांपासूनच उषा देवी यांना सतत पोटात दुखू लागले होते. अनेक वेळा अल्ट्रासाऊंड करण्यात आलं, परंतु त्यात कोणतीही मोठी समस्या दिसून आली नाही. स्थानिक डॉक्टरांकडून औषधं दिली जात होती, ज्यामुळे काही काळ आराम मिळत असे. अशा प्रकारे दीड वर्ष उलटलं. पण वेदना थांबल्या नाहीत, तर त्या वाढत गेल्या, अखेर सीटी स्कॅनमध्ये पोटात कात्री असल्याचे स्पष्ट झालं.
"माझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाही”
डॉक्टर संगीता कुमारी यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितलं की, "सिझर करताना अशा प्रकारच्या कात्रीचा वापर केला जात नाही. त्यानंतर गेल्या दीड वर्षात रुग्ण एकदाही माझ्याकडे उपचारासाठी आली नाही. माझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाही. कदाचित या दीड वर्षांच्या काळात रुग्णाने दुसऱ्या एखाद्या बोगस डॉक्टरांकडून काही सर्जरी करून घेतली असावी, ज्यामध्ये कात्री पोटात राहिली असेल. मला पूर्ण खात्री आहे की मी कात्री सोडलेली नाही, नातेवाईक मला विनाकारण या प्रकरणात ओढत आहेत."