Mango growers march: मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 13:21 IST2026-05-15T13:17:18+5:302026-05-15T13:21:26+5:30
राज्यातील शेतकरी कोकणाच्या पाठीशी

Mango growers march: मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच - राजू शेट्टी
रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे यंदा कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आंबा बागायतदारांना हेक्टरी पाच लाख आणि काजू बागायतदारांना हेक्टरी तीन लाख रुपये इतकी नुकसानभरपाई दिली जावी, या मागणीसाठी शुक्रवारी(दि. १५ मे) दुपारी साडेतीन वाजता गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा नेणारच असल्याचा ठाम निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
या पत्रकार उद्धवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बुधवारी चर्चा झाल्याने आणि त्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा निघणार की नाही, असा प्रश्न होता. मात्र, आता मोर्चा अडवायला जनरल डायर आले तरी मोर्चा निघणारच, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
कोकणातील शेतकरी कधीही आक्रमक होत नाहीत. हा त्यांचा दोष नाही. आतापर्यंत कोकणानेच सर्व महाराष्ट्राला प्रेरणा दिली आहे. स्वातंत्र्य लढ्याची चळवळही कोकणातूनच सुरू झाली होती. आता महाराष्ट्रातील सर्व शेतकरी कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे ठाकले आहेत. कोकणातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी हा मोर्चा होणारच असल्याचे त्यांनी सांगितले.
आंबा, काजूचे नेमके किती नुकसान झाले आहे, याचे सर्वेक्षणच झालेले नाही. महसूल मंत्र्यांच्या बैठकीतच ही बाब पुढे आली. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण पूर्ण होण्यासाठी अजून १० दिवस लागतील, असे सांगितले आहे. महसूल खाते झोपून राहिले होते. आता सर्वेक्षण कधी होणार, असा प्रश्न विनायक राऊत यांनी केला.
कॅबिनेट मंत्र्यांच्या तोंडाला पट्टी
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीनही जिल्ह्यांत कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र, वरिष्ठांना खूश करण्यासाठी हे कॅबिनेट मंत्री तोंडाला पट्टी लावून बसले आहेत, असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला.
रोजगारासाठी दावोस कशाला
रोजगार आणण्यासाठी दावोसला जाण्याची गरजच नाही. कोकणात दीड कोटी आंब्याची आणि तीन कोटी काजूची झाडे आहेत. यावर आधारित खूप मोठा व्यवसाय आहे. मात्र, त्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी केला.