कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कैद्याचा संशयास्पद मृत्यू? प्रशासनाच्या हलगर्जीमुळे जीव गेल्याचा नातेवाइकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 23:09 IST2026-05-06T23:09:11+5:302026-05-06T23:09:31+5:30
मंगळवारी सायंकाळी पाच वाजता छातीत दुखत असताना त्याला नऊपर्यंत रुग्णालयात का आणले नाही? असा सवाल उपस्थित करत नातेवाईकांनी उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात गोंधळ घातला.

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कैद्याचा संशयास्पद मृत्यू? प्रशासनाच्या हलगर्जीमुळे जीव गेल्याचा नातेवाइकांचा आरोप
कल्याण : कल्याणच्या आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याचा संशयास्पद मृत्यू झाला. ऋषिकेश पवार असे या मृत कैद्याचे नाव आहे. कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीमुळेच त्याचा बळी गेल्याचा गंभीर आरोप कैद्याच्या नातेवाईकांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ऋषिकेशला उपचारासाठी रुग्णवाहिकेऐवजी जेल सुप्रिडेंटच्या खासगी गाडीतून रुग्णालयात आणले होते. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता छातीत दुखत असताना त्याला नऊपर्यंत रुग्णालयात का आणले नाही? असा सवाल उपस्थित करत नातेवाईकांनी उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात गोंधळ घातला.
डोंबिवलीत राहणाऱ्या ऋषिकेशला एका वादाच्या प्रकरणात उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आधारवाडी कारागृहात होता. २० एप्रिल रोजी आठवडा बाजारातील मुकादम सोबत झालेल्या वादातून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल होता. कल्याण न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ऋषिकेश याच्या छातीत दुखू लागले. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्याऐवजी साडेनऊ वाजता उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात आणले.
रुग्णवाहिकेऐवजी कारागृह प्रशासनाच्या खासगी गाडीतून त्याला आणले. त्याला वेळेत रुग्णालयात नेले असते तर तो वाचला असता. कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीमुळे त्याचा जिव गेल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत दोषींवर कारवाईची मागणी केली. या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर आंदोलनाचा इशाराही कुटुंबीयांनी दिला आहे.
यासंदर्भात आधारवाडी कारागृहाचे अधीक्षक प्रदीप जगताप यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कैदी ऋषिकेश पवार याला मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास चक्कर आली. त्याला श्वनासाचा त्रास होत असल्याचे कारागृहातील शिपायाने पाहिले. तत्काळ कारागृहातील परिचारिकेस बोलावून वैद्यकीय कक्षात आणले. त्याचा रक्तदाब तपासला असता तो कमी झाला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सरकारी रुग्णवाहिकेतून त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती सरकारी रुग्णालयात नेले. त्याची तपासणी केल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ऋषिकेशच्या उपचारासाठी कारागृह प्रशासनाने तत्परता दाखवली होती. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी केलेला आरोप चुकीचे आहेत.