शब्दाला जागणारा नेता हरपला! हिंगोलीचे माजी आमदार बळीराम पाटील कोटकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:11 IST2026-04-23T12:09:09+5:302026-04-23T12:11:14+5:30
सलग दोनदा विधानसभेवर फडकवला होता झेंडा! ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शब्दाला जागणारा नेता हरपला! हिंगोलीचे माजी आमदार बळीराम पाटील कोटकर यांचे निधन
हिंगोली: हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बळीराम पाटील कोटकर (भानखेडेकर) यांचे गुरुवारी (२३ एप्रिल) पहाटे ३ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७८ वर्षांचे होते. कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ जनसंपर्क आणि कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांनी राजकारणात दिलेले योगदान हिंगोलीच्या इतिहासात अजरामर राहील.
पोलीस पाटील ते आमदार असा प्रेरणादायी प्रवास
१५ ऑगस्ट १९४७ रोजी, भारताच्या स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या बळीराम पाटील यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात गावचे पोलीस पाटील आणि सरपंच म्हणून केली होती. १९९० आणि १९९५ अशा सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवून हिंगोलीवर वर्चस्व निर्माण केले. विधानसभेच्या आश्वासन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली होती.
जिल्हा निर्मितीचे शिल्पकार
हिंगोली जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यासाठी आणि सेनगाव तालुका अस्तित्वात येण्यासाठी बळीराम पाटील कोटकर यांनी तत्कालीन काळात मोठे प्रयत्न केले होते. प्रशासकीय सोयी आणि ग्रामीण विकासाचा त्यांचा ध्यास वाखाणण्याजोगा होता. त्यांच्या निधनामुळे हिंगोली शहर आणि सेनगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि नातू असा मोठा परिवार आहे.