पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 18:56 IST2026-04-23T18:56:13+5:302026-04-23T18:56:38+5:30
या विक्रमी मतदानानंतर भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी या पहिल्या टप्प्यातील भाजपच्या कामगिरीसंदर्भात मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दावेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे...

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज (गुरुवारी) पार पडले. राज्यातील १५२ जागांसाठी पार पडलेल्या या मतदान प्रक्रियेत विक्रमी मतदान झाले. मतदारांनी भरभरून मतनाद केले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, दुपारी ३ वाजेपर्यंतच ७८.७७ टक्के मतदान झाले होते. तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा आकडा ८९.९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला. या विक्रमी मतदानानंतर भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी या पहिल्या टप्प्यातील भाजपच्या कामगिरीसंदर्भात मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दावेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले सुवेंदू अधिकारी? -
पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी निवडणूक आयोगाचे कौतुक केले. ते म्हणाले, "निवडणूक आयोग शांततापूर्ण निवडणूक घेण्यात यशस्वी ठरला आहे. माझ्या माहितीनुसार, जवळपास ९० टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी १२५ जागांवर भाजपचा विजय होईल. मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण आधीच झाले होते. मात्र, या निकालांनंतर ८५ टक्के हिंदू मतदार भाजपच्या पाठीशी उभा राहिल्याचे तुम्हाला दिसेल. दुसरा टप्पा आमच्यासाठी कठीण नाही. केवळ गुंडागिरीवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे."
पश्चिम बंगालमधील १५२ जागांवर आज सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली आणि सुरुवातीपासूनच मतदानकेंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या. कडाक्याचे उन्ह असूनही मतदार घराबाहेर पडले आणि त्यांनी उत्साहाने मतदान केले. यावेळी मतदानासाठी निवडणूक आयोगाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केली. सुमारे २ लाख सुरक्षा दलाचे जवान तैनात केले होते. याचा सकारात्मक परिणामही दिसून आला. क्षुल्लक घटना वगळता बंगालमधील पहिल्या टप्प्यातील मतदान जवळपास शांततेतच पार पडले. निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे.