पिण्याच्या पाण्यासाठी वणवण; तीन महिन्यांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 08:28 IST2026-04-20T08:28:29+5:302026-04-20T08:28:29+5:30
कोरगाववासीय उतरले रस्त्यावर

पिण्याच्या पाण्यासाठी वणवण; तीन महिन्यांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, कोरगाव : पेडणे तालुक्यातील कोरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील पाळेवाडा येथे गेल्या तीन महिन्यांपासून नळाला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. इतर वाड्यांना पाणीपुरवठा सुरळीत सुरू असताना केवळ पाळेवाडा भागाला पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पाणी विभाग) अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही समस्या कायम असल्याचे सांगितले. उपसरपंच दिवाकर जाधव यांनी सांगितले की, "आम्ही संबंधित विभागाला दोन दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास पेडणे येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल."
या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा असून सर्व घरांपर्यंत पोहोचत नाही. काही वेळा रात्री उशिरा पाणी येत असल्याने महिलांना जागरण करून पाणी भरावे लागत आहे. "आम्ही काम करावे की पाणी भरत बसावे?" असा संतप्त सवाल स्थानिक महिलांनी उपस्थित केला.
चांदेल येथील पाणी प्रकल्पातून संपूर्ण पेडणे तालुक्याला पाणीपुरवठा केला जातो. मात्र दाब कमी असल्याने काही भागांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची समस्या कायम आहे. त्यामुळे काही नागरिक विहिरी व बोअरवेलवर अवलंबून राहतात, तर अनेकांना नळाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे सरकारने या समस्येची तातडीने दखल घेऊन नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.