लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या १५ दिवसांच्या लॉकडाऊनचा पहिला दिवस अनेकांसाठी औत्सुक्याचा विषय होता. गेल्यावर्षी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात लावण्यात आलेले लॉकडाऊन आणि आताच्या लॉकडाऊनमध्ये काय फरक आहे, या औत्सुक्यातून अनेक जण निव्वळ फेरफटका मारण्यासाठी रस्त्यांवर फिरत होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद असली तरी काही भागांत रस्त्यांवरची वर्दळ बऱ्याच प्रमाणात सुरू होती. मुख्य चौकांमध्ये पोलिसांना तैनात केले होते. अधून-मधून येणाऱ्या-जाणाऱ्यांना ते कुठे जात आहे, अशी विचारणाही करत होते; पण विविध कारणे सांगून लोक आपली सुटका करून घेताना दिसले. त्यामुळे ड्यूटी करणारे पोलीसही हतबल झाले होते. या लॉकडाऊनमध्ये बँका, सरकारी कार्यालये, पेट्रोल पंप, किराणा दुकान अशा अनेक गोष्टी सुरू ठेवण्यास परवानगी असल्यामुळे बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांसाठी ते एक कारण ठरत होते.
न.प.ने केले दुकान सीलसंचारबंदी आणि कोरोनाच्या नियमांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी गुरुवारी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वात महसूल, नगर परिषद आणि पोलीस विभागाने इंदिरा गांधी चौक, बस डेपो, गुजरी आणि मार्केट लाइनमध्ये फिरून नागरिक व दुकानदारांना विविध सूचना केल्या. यादरम्यान आठवडी बाजारातील हिमालया वनस्पती आयुर्वेदिक भंडार येथे काही मुले गुटखा व खर्रा विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून दुकान सील केले. यावेळी बेशिस्त नागरिकांकडून ३४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत मुख्याधिकारी संजीव ओहोळ, अनिल गोवर्धन, पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार प्रामुख्याने सहभागी होते.
चामोर्शीत पाच हजारांचा दंड वसूलचामोर्शी : ‘ब्रेक दि चेन’मधील निर्बंधाची अंमलबजावणी बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून राज्यभरात सुरू झाली. कोरोनाकाळात संचारबंदीचे पालन योग्यरीतीने व्हावे यासाठी चामोर्शी शहराच्या बालउद्यान चौकाजवळ पोलीस प्रशासन सज्ज असून गुरूवारी नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करून ४ हजार ८०० रुपयांचा दंड सूल केला आहे. संचारबंदीची अंमलबजावणी व्हावी यासाठी चामोर्शी पोलीस प्रशासन सतर्क झाले. शहरात दिवसभर बँक, ‘अत्यावश्यक सेवा’ मेडिकल आदी कामांसाठी नागरिक बाहेर येत असतात. बाजारपेठ बंद असून अनावश्यक नागरिक वाहनाने व पायी रस्त्याने फिरतानाही दिसून येत हाेते. त्याला लगाम घालण्यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत. मुल, घोट, गडचिरोली मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची कसून चौकशी करून दंडही आकारण्यास सुरूवात केली. यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे, महसूल, नगरपंचायत व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहेत या नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.