नरेंद्र मोदी, पंतप्रधान, अध्यक्ष, श्री सोमनाथ ट्रस्ट
Marathi News: यावर्षीच्या प्रारंभी मी सोमनाथ स्वाभिमान पर्वात सहभागी होण्यासाठी सोमनाथ येथे गेलो. सोमनाथच्या मंदिरावर झालेल्या पहिल्या हल्ल्याला एक हजार वर्षे पूर्ण झाल्याचे स्मरण म्हणून हे पर्व आयोजित करण्यात आले होते. आता येत्या ११ मे रोजी मी पुन्हा सोमनाथला जाणार आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सोमनाथच्या पुनरुज्जीवित मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते, त्या घटनेला ७५ वर्षे होत असल्याच्या निमित्ताने तिथे उत्सव होणार आहे. सहा महिन्यांच्या आत सोमनाथ मंदिराशी संबंधित दोन महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले असून, उद्ध्वस्त केलेल्या मंदिराच्या पुनरुज्जीवनाचा प्रवास म्हणजेच ज्याला आपण ‘विध्वंस ते सृजन’ असे म्हणतो, तसा हा प्रवास आहे.
सोमनाथासमोरचा विशाल सागर कालातीत आहे. साम्राज्ये उभी राहिली आणि लयाला गेली, लाटा उसळत-विरत राहिल्या, युद्ध आणि क्रांतीच्या प्रदेशातून इतिहास आपली वाटचाल करत राहिला, तरीही, भारतीयांच्या मनातली ‘सोमनाथ’ नावाची चेतना अखंड जागीच राहिली.
हुकूमशाही अत्याचारांच्या विरोधात ठामपणे पाय रोवून उभ्या राहिलेल्या अनेकांचे आज स्मरण केले पाहिजे. लाकुलिशा आणि सोमा सरमन यांनी या प्रभासाचे रूपांतर तत्त्वज्ञानाच्या एका मोठ्या केंद्रात केले. वल्लभीचे चक्रवर्ती महाराज धरासेन चौथे यांनी कित्येक शतकांपूर्वी येथे दुसरे मंदिर बांधले. भीमा देवी, जयपाल आणि आनंदपाल यांनी आक्रमकांविरोधात लढून आपल्या संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन केले. राजा भोजाने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत केली. कर्णदेव आणि सिद्धराजा जयसिंह यांनीही गुजरातची राजकीय आणि सांस्कृतिक ताकद पुनरुज्जीवित करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. भाव बृहस्पति, कुमारपाल, सोळंकी आणि पशुपात आचार्य यांनी या पवित्र स्थळाची पुनर्बांधणी करून तिथे पूजा-अर्चना आणि शिक्षणाचे मोठे केंद्र उभारले. विशालदेव वाघेला आणि त्रिपुरांतक यांनी येथील बौद्धिक आणि आध्यात्मिक परंपरांचे संरक्षण केले. महिपालदेव आणि रा खंगार यांनी विध्वंसानंतर पुन्हा उपासना सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत प्रतिकूल काळातही भक्तीची परंपरा अखंड ठेवली. तसेच बडोद्याच्या गायकवाड यांनी यात्रेकरूंच्या हक्कांचे संरक्षण केले. आणि अर्थातच, आपल्या भूमीने हमीरजी गोहिल आणि वेगदाजी भिल्ल यांसारख्या शूर व्यक्तिमत्त्वांना जन्म दिला, ज्यांचे बलिदान आणि शौर्य आजही सोमनाथच्या जिवंत स्मृतीचा भाग बनले आहे.
१९४०च्या दशकात, नवीन प्रजासत्ताकाचा पाया रचला जात असताना सरदार पटेल यांना एक गोष्ट मनापासून अस्वस्थ करत होती - सोमनाथ मंदिराची दुरवस्था. एकदा दिवाळीचा सण असताना १३ नोव्हेंबर १९४७ रोजी, ते मंदिराच्या त्या भग्न अवशेषांजवळ उभे राहिले, आणि हाताच्या ओंजळीत समुद्राचे पाणी घेऊन म्हणाले, ‘या नववर्षाच्या (गुजराती) शुभदिनी आम्ही सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली जावी, असा संकल्प केला आहे. सौराष्ट्रातील जनतेने, यासाठी जे शक्य आहे ते केले पाहिजे. हे एक पवित्र कार्य असून, यात सर्वांनी सहभागी व्हायला हवे.’ - सरदार पटेल यांच्या त्या एका आवाहनाला केवळ गुजरातच नाही, तर संपूर्ण भारतातील जनतेने मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला.
‘विकास आणि वारसा’ या तत्त्वापासून प्रेरणा घेऊन, सोमनाथपासून काशीपर्यंत, कामाख्यापासून केदारनाथपर्यंत, अयोध्येपासून उज्जैनपर्यंत आणि त्र्यंबकेश्वरपासून श्रीशैलमपर्यंत आपल्या आध्यात्मिक केंद्रांचे पारंपरिक स्वरूप टिकवून ठेवत त्यांना अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो. सोमनाथच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि एक हजार वर्षांच्या शौर्याचे स्मरण म्हणून, सोमनाथमध्ये पुढील एक हजार दिवस विशेष पूजा आयोजित केली जाईल. जेव्हा तुम्ही सोमनाथच्या किनाऱ्यावर उभे राहाल, तेव्हा तेथील प्राचीन प्रतिध्वनींना तुमच्याशी संवाद साधू द्या. तुम्हाला भारताच्या अजिंक्य वृत्तीचा अनुभव येईल आणि अनेक प्रयत्न होऊनही आपली संस्कृती अपराजित का राहिली, हे उमजेल.
Web Summary : PM Modi reflects on Somnath's resilience through ages. He highlights reconstruction efforts by leaders like Sardar Patel, emphasizing India's unbroken spirit and cultural heritage, from destruction to creation. The PM sees it as a symbol of India's spiritual centers' rejuvenation.
Web Summary : पीएम मोदी ने सोमनाथ के लचीलेपन पर प्रकाश डाला। सरदार पटेल जैसे नेताओं के पुनर्निर्माण प्रयासों पर जोर दिया, भारत की अटूट भावना और सांस्कृतिक विरासत पर प्रकाश डाला, विनाश से सृजन तक। पीएम इसे भारत के आध्यात्मिक केंद्रों के कायाकल्प के प्रतीक के रूप में देखते हैं।