अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 07:41 IST2026-05-15T07:39:02+5:302026-05-15T07:41:13+5:30
सध्या तरी प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे पक्षात बिनपदाचे नेते आहेत. हा गोंधळ आणि अविश्वासाचे वातावरण पाहता अजित पवार यांच्या पश्चात पक्षाच्या वाटचालीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अविश्वासाचा आलेख दिवसेंदिवस चढताना दिसतो आहे. त्यात भर पडली आहे ती पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीने. या यादीत प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांना कोणतेच पद देण्यात आलेले नाही.
एकीकडे हे नेते कोणत्याही पदाविना पक्षात आहेत, तर दुसरीकडे पक्षाचे सर्व आर्थिक व्यवहार सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ आणि जय पवार हे तिघे पाहणार आहेत. म्हणजेच पक्षाच्या तिजोरीची किल्लीही अजितदादांच्या कुटुंबाकडे असणार आहे. यामुळे अजित पवारांच्या कुटुंबीयांनी या पक्षावर एकहाती ताबा मिळवल्याचे दिसते.
‘हा पक्ष पवार कुटुंबाचा असून, तो आम्हीच चालवणार’ अशा थाटात सध्या पक्षाचे कामकाज पार्थ पवार यांच्याकडून सुरू असल्याची पक्षात चर्चा आहे. आईवर पार्थ पवार यांचा पगडा आहे, आईच्या आडून पक्षाचा गाडा पार्थच हाकत आहेत. पक्ष चालवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी ज्येष्ठ आणि तरुण यांचा समन्वय गरजेचा. पण राष्ट्रवादी अजित पवार गटात त्याचाच अभाव दिसतोय. त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या साडेतीन महिन्यातच पक्षात अंतर्गत धुसफुस, नाराजी आणि अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.
सुरुवात झाली राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून या पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे गेल्यानंतर लगेचच. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या सल्लामसलतीने त्या पक्ष चालवतील अशी शक्यता दिसत होती. मात्र कार्याध्यक्षपद मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन कार्याध्यक्ष प्रफुल पटेल (तत्कालीन यासाठी की सध्या प्रफुल पटेल हे कार्याध्यक्ष आहेत असा अधिकृत कागदोपत्री कुठेच उल्लेख नाही.) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना धक्का दिला.
कार्याध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड होताच १० मार्च २०२६ रोजी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून २८ जानेवारी २०२६ नंतरचा (अजित पवार यांच्या निधनानंतरचा) पक्षातर्फे कुणीही केलेला पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, अशी विनंती केली.
अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी १६ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात पक्षाच्या अध्यक्षाच्या अनुपस्थितीत सर्व अधिकार हे कार्यकारी अध्यक्षांना म्हणजेच प्रफुल पटेलांना असतील, असे म्हटले होते. पटेल आणि तटकरेंनी हे पत्र देताना सुनेत्रा पवारांना विश्वासात घेतले नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे दोन नेते पक्ष ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा त्यावेळी सुरू झाली.
सुनेत्रा पवारांनी पटेल-तटकरेंशी चर्चा न करताच त्यांनी पाठवलेले हे पत्रच ग्राह्य धरू नये, असे आयोगाला कळवले. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची जी यादी पाठवली होती त्यात पटेल आणि तटकरे यांना पक्षात कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. यामुळे पटेल यांची कार्यध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्याचीही चर्चा होती.
अस्वस्थ पटेल आणि तटकरे यांनी काही काळ अलिप्त राहून आपली नाराजीही दाखवून दिली. त्यानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी या दोन्ही नेत्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली, मात्र अद्याप सुनेत्रा पवारांचे पत्र आयोगाकडे कायम आहे. त्यामुळे प्रफुल पटेल कागदोपत्री पक्षाच्या कुठल्याच पदावर नाहीत. त्यातच २९ एप्रिल २०२६ रोजीचे सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेले आणखी एक पत्र समोर आले. या पत्रात राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यादी व कामकाजाचे वाटप नोंदवण्यात आले आहे.
सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षा, पार्थ पवार सरचिटणीस, जय अजित पवार राष्ट्रीय सचिव यांच्यासह आताच निवडून आलेल्या आमदार सना मलिक, चेतन तुपे, सरोज अहिरे या तरुण आमदारांची नावे आहेत. छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचे यादीत नाव असले तरी त्यांच्याकडे कोणतीच जबाबदारी नाही.
बातमी फुटल्यावर ‘ही तांत्रिक चूक असल्या’चा खुलासा सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियाद्वारे केला. खुलासा करून तीन दिवस झाले तरी निवडणूक आयोगाला सुधारित यादी सादर करण्यात आलेली नाही. यापूर्वीच्या पत्राने उडालेला गोंधळ ताजा असताना दुसऱ्या पत्रात एवढी मोठी तांत्रिक चूक मुळात होऊच कशी शकते? सध्या तरी प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे पक्षात बिनपदाचे नेते आहेत. हा गोंधळ आणि अविश्वासाचे वातावरण पाहता अजित पवार यांच्या पश्चात पक्षाच्या वाटचालीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
अग्रलेख लिहून होईपर्यंतच नाराजीतून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्ष नेतृत्वातील गोंधळामुळे भविष्यात आणखी काही जणांनी हे पाऊल उचलले तर आश्चर्य वाटायला नको.