प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 12:31 IST2026-05-09T12:31:40+5:302026-05-09T12:31:57+5:30
ग्रेटर नोएडातील दादरीमध्ये एका २० वर्षीय नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. कोट्यवधींच्या मालमत्तेच्या हव्यासापोटी मोनिकाची हत्या झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.

प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या दादरी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. अवघ्या २० वर्षांच्या मोनिका नागर या नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून, सासरच्या मंडळींनी घाईघाईने तिचे अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोनिकाच्या माहेरच्या लोकांनी वेळीच पोलिसांना माहिती दिल्याने, पोलिसांनी जळत्या चितेतून तिचा मृतदेह बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
सेक्टर 'जू' येथील रहिवासी असलेल्या मोनिकाने १६ फेब्रुवारी २०२६ रोजी घोडी बछेडा गावातील अनुज चौहान याच्याशी कोर्ट मॅरेज केले होते. सुरुवातीला दोन्ही कुटुंबांनी या लग्नाला विरोध केला होता, मात्र नंतर ते मान्य झाले. पण लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांतच या नात्याचा असा भीषण अंत होईल, याची कल्पना कोणालाही नव्हती.
कोट्यवधींच्या मालमत्तेचा हव्यास?
मोनिकाच्या आईने, रेणू नागर यांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे. रेणू यांच्या दाव्यानुसार, मोनिकाच्या नावावर सुमारे एक कोटी रुपयांची मालमत्ता होती. लग्नानंतर सासरचे लोक ती मालमत्ता विकून पैसे आणण्यासाठी मोनिकावर सतत दबाव टाकत होते. मोनिकाने मालमत्ता विकण्यास नकार दिल्याने तिचे शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आले आणि अखेर तिची हत्या करण्यात आली, असा आरोप आईने केला आहे.
स्मशानभूमीत पोलिसांची धाड अन् आरोपींची पळापळ
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मोनिका आणि तिचा पती अनुज यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला होता. त्यानंतर मोनिका मृतावस्थेत आढळली. सासरच्या मंडळींनी तातडीने तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेला. जेव्हा पोलीस आणि मोनिकाचे नातेवाईक तिथे पोहोचले, तेव्हा चितेने पेट घेतला होता. पोलिसांनी तातडीने जळत्या चितेतून मृतदेह बाहेर काढला. हे पाहून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
निक्की हत्याकांडाची आठवण ताजी
या घटनेने परिसरातील नागरिकांना २०२५ मधील गाजलेल्या 'निक्की हत्याकांडा'ची आठवण करून दिली आहे. त्या प्रकरणातही नवविवाहितेची जाळून हत्या करण्यात आली होती. एसीपी जितेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, "मृतदेहाचा काही भाग जळाला आहे, मात्र तो ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. ७ मे रोजी मोनिकाने फोन करून आपल्याला मारहाण होत असल्याचे सांगितले होते, अशी तक्रार तिच्या आईने दिली आहे."