Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 10:16 IST2026-05-09T10:16:03+5:302026-05-09T10:16:57+5:30
Tamil Nadu Goverment Formation: राज्यपालांची भेट घेतल्यानंतरही बहुमताचा आकडा जुळवता न आल्याने विजय यांचा शपथविधी दोन वेळा लांबणीवर पडला आहे. दरम्यान, राज्यपालांसमोर बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना पाठिंब्याचं खोटं पत्र दिल्याचा आरोप एएमएमके पक्षाचे प्रमुख टीटीव्ही दिनाकरन यांनी केला आहे.

Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव
नुकत्याच झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसल्याने तसेच विजय यांना बहुमताचा आकडा गाठता येत नसल्याने तामिळनाडूत सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतरही बहुमताचा आकडा जुळवता न आल्याने विजय यांचा शपथविधी दोन वेळा लांबणीवर पडला आहे. दरम्यान, राज्यपालांसमोर बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना पाठिंब्याचं खोटं पत्र दिल्याचा आरोप एएमएमके पक्षाचे प्रमुख टीटीव्ही दिनाकरन यांनी केला आहे.
टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी आमच्या पक्षाच्या पाठिंब्याचं खोटं पत्र राज्यपालांकडे दिलं, असा आरोप टीटीव्ही दिनाकरन यांनी केला. तसेच याविरोधात आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करम्यासाठी पोलीस ठाण्यात जात आहोत, असेही दिनाकरन यांनी सांगितले.
दिनाकरन यांनी पुढे सांगितले की, आमच्या पक्षाचे आमदार कामराज यांच्याकडून टीव्हीकेच्या समर्थनार्थ एक पत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. मला राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मिळाला होता. तसेच मी त्यांना खरं पत्र दाखवलं. ते पत्र मला आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार पलानीसामी यांच्याकडून मिळालं होतं.
दरम्यान, टीव्हीकेने या पत्राची बनावट नक्कल राज्यपालांकडे जमा केल्याचे मला समजले. राज्यपालांनी मूळ पत्र मागितले होते. विजय यांच्या पक्षाने केलेली कृती ही फसवणूक आहे. तसेच आम्ही याविरोधात फौजदारी तक्रार नोंदवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात एआयएडीएमकेच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होईल, असा दावाही दिनाकरन यांनी यावेळी केला. तसेचआम्ही इतर पक्षांकडे पाठिंबा मागितला असून, राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहोत.