‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 10:15 IST2026-05-09T10:14:43+5:302026-05-09T10:15:07+5:30
वॅगनआर कारची मागणी पूर्ण न झाल्याने नवरदेवाच्या बहिणीने मुलीच्या केसांचे कारण पुढे करत लग्न मोडले.

‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
बिहारच्या मुजफ्फरपूरमधून हुंड्यापायी लग्न मोडल्याची एक संतापजनक आणि चकीत करणारी घटना समोर आली आहे. नवरदेव पक्षाने सुरुवातीला हुंड्यात वॅगनआर कारची मागणी केली होती. मात्र, ही मागणी पूर्ण करण्यास मुलीच्या कुटुंबीयांनी असमर्थता दर्शवताच, 'मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत' असे विचित्र कारण सांगून हे लग्न मोडण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी तीन महिलांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिठनसराय मुस्तफापूर येथील एका तरुणीचे लग्न वैशाली जिल्ह्यातील चेहराकला येथील तरुणाशी ठरले होते. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी एका नामांकित हॉटेलमध्ये साखरपुड्याचा भव्य कार्यक्रम पार पडला. पीडित कुटुंबाचा असा आरोप आहे की, सगाईच्या वेळी त्यांनी सुमारे ४.३७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, महागडे कपडे आणि १.५१ लाख रुपये रोख दिले होते. इतकेच नाही तर लग्नाच्या खर्चासाठी अग्रीम म्हणून ५.५१ लाख रुपयेही दिले होते. एकूण १४.१५ लाख रुपये सगाईपर्यंत खर्च झाले होते.
कारची मागणी आणि केसांचा बनाव
धक्कादायक बाब म्हणजे साखरपुडा पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवरदेवाच्या घरातून फोन आला. नवरदेवाची बहीण सीमा कुमारी हिने फोनवर सांगितले की, "मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत आणि तिचे केस गळत असल्याचे वाटते, त्यामुळे हे लग्न होणार नाही." मात्र, मुलीच्या आईने असा आरोप केला आहे की, लग्नाची तारीख ठरवताना नवरदेव पक्षाने वॅगनआर कारची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही असे कळल्यावर त्यांनी हा केसांचा बनाव रचला.
मुलीला मानसिक धक्का, पोलिसांत तक्रार
मुलीच्या कुटुंबीयांनी एफआयआरमध्ये स्पष्ट केले आहे की, सगाई ठरण्यापूर्वी दोन्ही कुटुंबे अनेकवेळा एकमेकांना भेटले होते. त्यावेळी मुलीच्या केसांवरून कोणतीही तक्रार नव्हती. केवळ हुंडा मिळत नसल्याने अशा प्रकारे निराधार आणि अपमानजनक आरोप करून मुलीला मानसिक त्रास दिला जात आहे. या घटनेमुळे पीडित तरुणीला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
याप्रकरणी पीडितेच्या आईने महिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी फसवणूक, मारहाण आणि हुंडा छळ अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सिटी एसपी मोहिबुल्लाह अंसारी यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुराव्यांच्या आधारे आरोपींवर कडक कारवाई केली जाईल.