मैत्री, मित्राचा मृत्यू आणि आता बदला; मुलीच्या लग्नासाठी आलेल्या माजी NSG कमांडोची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 17:51 IST2026-04-30T17:51:06+5:302026-04-30T17:51:40+5:30
हरियाणात एका माजी एनएसची कमांडोची पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली.

मैत्री, मित्राचा मृत्यू आणि आता बदला; मुलीच्या लग्नासाठी आलेल्या माजी NSG कमांडोची निर्घृण हत्या
Haryana Crime: हरियाणाच्या गुरुग्राममध्ये ३० एप्रिलच्या सकाळी एका खळबळजनक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला. एका माजी एनएसजी कमांडोची भरबाजारात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे, मृत व्यक्ती एका माजी सरपंचाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होती आणि नुकतीच पेरोलवर बाहेर आली होती.
ही घटना गुरुग्रामच्या कासन भागातील आहे. ५५ वर्षीय मृत सुंदर हे ३० एप्रिलच्या सकाळी ६ ते ७ च्या सुमारास नेहमीप्रमाणे फिरायला निघाले होते. ते एका चौकात उभे असताना अचानक दोन हल्लेखोर तिथे आले आणि त्यांनी सुंदर यांच्यावर बेछूट गोळीबार सुरू केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यात हल्लेखोर गोळ्या झाडताना स्पष्ट दिसत आहेत. गोळीबारानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. सुंदर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मुलीच्या लग्नासाठी आला होता पेरोलवर
सुंदर यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीचे लग्न २० एप्रिल रोजी पार पडले होते. याच लग्नासाठी सुंदर पेरोलवर (रजा) बाहेर आले होते. कार्तिक (वय २०) आणि त्याचा साथीदार गुलशन (वय २२) अशी संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत.
बदल्याची पार्श्वभूमी
या हत्याकांडाची मुळे ८ वर्षे जुन्या एका वादात आहेत. मृत सुंदर आणि ज्याची हत्या झाली होती ते माजी सरपंच बहादूर यांच्यात घनिष्ट मैत्री होती. २०१८ मध्ये पैशांच्या व्यवहारावरून या दोन्ही मित्रांमध्ये मोठा वाद झाला. या वादातून सुंदर यांनी सरपंच बहादूर यांची हत्या केली आणि स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले होते. याच हत्येचा बदला घेण्यासाठी कार्तिकने सुंदर यांची हत्या केल्याचा आरोप पत्नीने केला.
पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
घटनेनंतर आरोपी कार्तिक आणि त्याचा साथीदार फरार झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.